धमतरी : छत्तीसगडच्या धमतरी येथे काल बोलेरो आणि ट्रक दरम्यान झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 10 जणांसह एकूण 11 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या दुर्देवी घटनेमुळे सोरम भठगावावर गाशोककळा पसरली आहे. जेव्हा हे मृतदेह घेऊन रुग्णवाहिका गावात आल्या, तेव्हा नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडत आक्रोश केला. नातेवाईकच नव्हे तर संपूर्ण गावाच्या डोळ्याला धारा लागल्या होत्या. हे 11 मृतदेहांना जेव्हा पाच सरणावर ठेवून अग्नी देण्यात आला, तेव्हा तर सर्वांनीच हंबरडा फोडला. स्मशानभूमीत आक्रोश… आक्रोश आणि आक्रोशच निर्माण झाला होता. या अपघातात धरमराज साहू यांचं अख्खं कुटुंब संपलं. मृतांमध्ये दोन मुलं आणि पाच महिलांचा समावेश होता.
धमतरी येथे बोलेरो आणि ट्रकच्या अपघातात 11 जण ठार झाले होते. यात एकाच कुटुंबातील 10 जणांचा समावेश होता. गुरुवारी पोस्टमार्टम करून सात रुग्णवाहिकेत हे 11 मृतदेह गावात आणण्यात आले. मृतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी संपूर्ण सोरम भठगाव लोटला होता. संपूर्ण गाव स्मशानभूमीत आला होता. या सर्वांच्या डोळ्यात अश्रू होते. संपूर्ण स्मशानभूमीत रडारड सुरू होती. धरमराज यांना तीन मुलं होते. यातील एक मुलगा गरियाबंद येथे राहतो. तर दुसरा मुलगा अपघातावेळी गावातच होता.
या अपघातानंतर आता या कुटुंबात वृद्ध आई आणि कुटुंबातील दोनच मुले उरली आहे. धरमराज (55), पत्नी उषा (52), मुलगा केशव (34), भावाची पत्नी लक्ष्मी (45), सून टोमिन (33), संध्या (24), रमा (20), पुतण्या शैलेंद्र (22), योग्यांश (3), दीड वर्षाचा इशान आणि चालक डोमेश ध्रुव वय 19 यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे.
स्मशानभूमीत पाच सरणं रचली होती. एक ड्रायव्हर डामेश ध्रुव याचं होतं. दुसरं सरण धरमराज आणि त्यांची पत्नी उषा यांचं होतं. तिसरं लक्ष्मी, शैलेंद्र आणि रमाचं, चौथं संध्या, योग्यांश आणि इशांत यांचं आणि पाचवं केशव आणि त्याची पत्नी टॉमिन यांचं रचलं होतं. अशा पद्धतीने पाच सरणांवर अकरा मृतदेह ठेवून त्यांना मुखाग्नी देण्यात आला होता.
सोरम भठगाव येथील 11 जण बोलेरोने मामाच्या घरी लग्नाला गेले होते. कांकेर येथील मरकाटोला येथे हा विवाह सोहळा होता. बुधवारी रात्री नॅशनल हायवे-30 वर जगतरा येथे समोरून येणाऱ्या ट्रकला बोलेरोने जोरदार धडक दिली. या अपघातात बोलेरोचा चक्काचूर झाला होता. त्यात सर्वच्या सर्व अकरा जणांचा मृत्यू झाला. त्यात एकाच कुटुंबातील 10 जणांचा समावेश होता.