अलवर : देशात एकीकडे भोंग्यांचे राजकारण तर दुसरीकडे बुलडोझर मॉडेलवर राजकारण तापलेलं आहे. उत्तर प्रदेशवरून सुटलेले बुलडोझर मॉडेल (Bulldozer Model) राजस्थानमध्ये काँग्रेसने हायजॅक केलं आहे. आता राजस्थानमध्ये काँग्रेसदेखील (Congress) बुलडोझरवर स्वार झाल्याचे दिसत आहे. राजस्थानमधील अलवर येथील एका मंदिरावरून भाजप-काँग्रेस आमने-सामने आले आहेत. राजस्थानमधील अलवर येथे रुंदीकरणाचे काम सुरू आहे. यादरम्यान 300 वर्ष जुन्या मंदिरावरही बुलडोझर चालवण्यात आला. त्या कारवाईवरून भाजपने राजस्थानमधील काँग्रेस सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच हे सूडाचे राजकारण केले जात असल्याचे म्हटलं आहे. तसेच विकासाच्या नावाखाली मंदिर उद्ध्वस्त करणे योग्य नाही, त्याचवेळी राजगड नगरपालिकेत भाजपची (BJP) सत्ता असून ही कारवाई त्यांनीच केल्याचे सांगत काँग्रेसने पलटवार केला आहे.
देशात बुलडोझरवर सुरू असलेल्या राजकारणाने वणव्याचे रूप घेतले आहे. आता हा वनवा राजस्थानमध्ये पोहचला असून मंदिरावरही बुलडोझर चावला गेला आहे. याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून याप्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे. तर याबाबत अधिकारी सध्या फारसे काही बोलत नाहीत.
मास्टर प्लॅननुसार राजगडमधील अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्यात आल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. वर्षानुवर्षे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले होते. महसुली नोंदीनुसार येथे सुमारे 60 फुटांचा रस्ता आहे. त्यामुळे त्यामुळे जेसीबीने अतिक्रमण हटविण्यात आले आहे.
यावेळी भाजपने केलेल्या आरोपाचे खंडण काँग्रेसचे आमदार जोहरीलाल मीना यांनी केले. तसेच ते म्हणाले, राजगड शहरातील अतिक्रमण हटवण्यात आले आहे. येथील पालिकेत भाजपची सत्ता आहे. त्यामुळे यावर आपण काही सांगू शकत नाहीत. दुसरीकडे, प्रशासनाच्या पातळीवर ही कारवाई करण्यात आल्याचे पालिका मंडळाचे अध्यक्ष सांगतात. पालिका मंडळाच्या स्तरावर तसा ठराव मंजूर झाल्याचे प्रशासनाचेही म्हणणे आहे. त्यानंतरच अतिक्रमण हटवले जाते. प्रत्यक्षात 2012 च्या मास्टर प्लॅनमध्ये 60 फुटांचा रस्ता आहे. या मास्टर प्लॅनचा संदर्भ देऊन ही कारवाई करण्यात आली आहे.
या कारवाईवर प्रतिक्रिया देताना राज्यसभा खासदार आणि भाजप नेते किरोडीलाल मीना म्हणाले की, येथील सत्तेत असणाऱ्या भाजपने ही चूक केली आहे. 300 वर्षे जुन्या मंदिर तोडायला नको होते. तर दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया म्हणाले की, 300 वर्षे जुन्या मंदिरावर अतिक्रमण कारवाई कशी काय होऊ शकते. दरम्यान भाजपने आपली टीम घटनास्थळी पाठवली असून ती तीन दिवसांत आपला अहवाल देईल.
भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा म्हणाले की, विकासाच्या नावाखाली देवाच्या मंदिरावर हल्ला होणे अत्यंत खेदजनक आहे. यावर त्यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला. तसेच ते म्हणाले, तुम्ही सूडाच्या भावनेने व्होटबँकेचे राजकारण करतक आहात.
भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांच्या आरोपांवर पलट वार करताना भाजप राजकारण करत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंग दोतासरा यांनी केला. तसेच ते म्हणाले की 2018 मध्ये भाजप मंडल अध्यक्षांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून हे अतिक्रमण काढण्याची शिफारस केली होती. राजगडमध्ये भाजपची सत्ता आहे. त्याचे अध्यक्ष सतीश दुहरिया आहेत. हे अतिक्रमण काढण्याचा ठराव बोर्डाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. त्यानंतरच हे अतिक्रमण काढण्यात आले आहे. काँग्रेस सरकारमध्ये मंदिरांमध्ये छेडछाड केली जात नाही. हा भाजपचा अजेंडा राहिला आहे.
येथे मंदिर तोडण्याच्या वादानंतर अलवरचे जिल्हाधिकारी शिवप्रसाद एम नकाते यांनी अहवाल जारी केला आहे. अहवालानुसार, पालिका मंडळाच्या दुसऱ्या बैठकीत 8 सप्टेंबर 2021 रोजी मास्टर प्लॅन आणि गौरव पथातील समस्या सांगून अतिक्रमण काढण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. ६ एप्रिल रोजी सर्व अतिक्रमणांवर मार्किंग करून नोटिसा बजावण्यात आल्या होत्या असेही या अहवालात म्हटलं आहे.
राजस्थानमधील अलवर येथे मंदिरावर बुलडोझर चालवला गेला.#Rajasthan #Shivatemple #demolished pic.twitter.com/x1BR9xOx4M
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 22, 2022