विमानाच्या लँडिंगवेळी भयंकर घडलं, प्रवाशांत घबराट; टेल स्ट्राईक काय असते?
एअर इंडिया या विमान वाहतूक कंपनीचे Airbus A321 हे विमान बुधवारी (20 मे) दिल्लीहून बंगळुरूला जात होते. लाँडिंग करताना या विमानासोबत अपघात झाला. या विमानाचे टेल म्हणजेच मागचा भाग थेट जमिनीशी धडकला.

Air India Airplane Tail Strike : गेल्या काही दिवसांपासून विमान दुर्घटनांच्या अनेक घटना घडल्या आहेत. यात अनेकांचा मृत्यूही झाला आहे. खराब हवामान, विमानात अचानक झालेली तांत्रिक बिघाड यामुळे या दुर्घटना झालेल्या आहेत. अशा प्रकारच्या दुर्घटना होऊ नये यासाठी विमान वाहतुकीचे तसेच विमानातून प्रवास करतानाचे सर्व नियम पाळले जावेत, यासाठी कठोर प्रयत्न केला जातो. परंतु तरीदेखील अशा प्रकारच्या घटना घडतच आहेत. त्याचीच प्रचिती 20 मे रोजी पुन्हा एकदा आली. दिल्लीवरून बंगळुरूला जाणाऱ्या विमानासोबत टेल स्ट्राईकची घटना घडली आहे. विमानाचा अपघात झाला आहे. सुदैवाने यात प्रवासी आणि क्रू मेंबर्स सुखरुप आहेत.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार एअर इंडिया या विमान वाहतूक कंपनीचे Airbus A321 हे विमान बुधवारी (20 मे) दिल्लीहून बंगळुरूला जात होते. लाँडिंग करताना या विमानासोबत अपघात झाला. या विमानाचे टेल म्हणजेच मागचा भाग थेट जमिनीशी धडकला. अशा प्रकारच्या अपघाताला ‘टेल स्ट्राईक’ म्हटले जाते. बंगळुरुच्या विमानतळावर उतरताना ही दुर्घटना घडली. हे विमान जेव्हा विमानतळावर लँडिंग करत होते त्याच वेळी रवनवेवरून एक वाईड बॉडी असलेल्या विमानाने तेथून टेकऑफ केले होते. मोठ्या आकाराची विमाने जेव्हा आकाशात उड्डाण करतात तेव्हा ते मागे हवेचा मोठा प्रवाह सोडतात. त्यालाच वेक टर्ब्यूलन्स असे म्हटले जाते. याच वेक टर्ब्यूलन्समुळे Airbus A321 या विमानासोबत टेल स्ट्राईकची घटना घडली.
विमानासोत टेल स्ट्राईक नेमकी कशी घडली?
वेक टर्ब्युलन्समुळे पायलटला विमानावर नियंत्रण मिळवता आले नाही. त्यामुळे वेक टर्ब्यूलन्स असल्याचे समजताच पायलटने विमान जमिनीवर उतरवण्याऐवजी अचानक विमानाचे उड्डाण केले. विमानाने हवेत पुन्हा उड्डाण केले. त्यामुळे होणारा संभाव्य धोका टळला. परंतु या प्रक्रियेदरम्यान विमानाचा मागचा हिस्सा म्हणजेच टेल रनवेला घासली. विमानाचा समोरचा भाग खूपच वर गेल्याने मागचा भाग जमिनीवर आदळला. परंतु या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. पायलट, क्रू मेंबर्स तसेच इतर प्रवासी सगळे सुरक्षित आहेत.