हिंदूंनी किती मुलं जन्माला घालावीत? योजनेवरून केजरीवाल यांचा खोचक टोला

मोहन भागवत यांनी हिंदूंना अधिकाधिक मुलं जन्माला घालायला सांगितलं आहे, तर रेखा गुप्ता यांनी तीनपेक्षा जास्त मुलांच्या आईवडिलांना सरकारी योजनेचा लाभ देण्यास नकार दिला आहे. यावरून आता अरविंद केजरीवाल यांनी निशाणा साधला आहे.

हिंदूंनी किती मुलं जन्माला घालावीत? योजनेवरून केजरीवाल यांचा खोचक टोला
अरविंज केजरीवाल, रेखा गुप्ता
Image Credit source: Instagram
| Updated on: Jul 29, 2026 | 2:23 PM

आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यावर सडकून टीका केली आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वक्तव्यांमध्ये विसंगती असल्याचा दावा केजरीवाल यांनी केला आहे. दोघांच्या वक्तव्यांमुळे आता हिंदूंमध्ये किती मुलं जन्माला घालावीत याबद्दल संभ्रम निर्माण होत असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे. एक्स (ट्विटर) अकाऊंटवरील पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं, ‘मोहन भागवतजी म्हणत आहेत की प्रत्येक हिंदू व्यक्तीने शक्य तितकी जास्त मुलं जन्माला घालावीत. रेखा गुप्ता म्हणत आहेत की तीनपेक्षा जास्त मुलं असल्यास दिल्लीत लक्ष्मी योजनेचा लाभ मिळणार नाही.’

‘बिचारे हिंदू संभ्रमात आहेत. रेखाजी आणि भागवतजी यांनी मिळून सांगावं की हिंदूंनी अखेर काय करावं’, असा खोचक सवाल त्यांनी केला आहे. दिल्ली लक्ष्मी योजनेअंतर्गत पात्र होण्यासाठी महिलेचं वय 21 ते 60 वर्षांदरम्यान असावं लागतं. तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असावं. महिला किमान 10 वर्षांपासून दिल्लीची कायम रहिवासी असावी आणि तिला तीन किंवा त्यापेक्षा कमी मुलं असावीत. पात्रतेचे हे निकष पूर्ण केल्यावरच सरकार दरमहा 2500 रुपयांची आर्थिक मदत देईल. तर दुसरीकड मोहन भागवत यांनी लोकसंख्येचं संतुलन, घटणारा जन्मदर यांचा हवाला देत हिंदू कुटुंबांना किमान तीन किंवा अधिक मुलं जन्माला घालण्याचा सल्ला दिला आहे.

केजरीवाल यांची पोस्ट-

आरएसएसच्या शताब्दीनिमित्त दिल्लीत आयोजित कार्यक्रमात मोहन भागवत म्हणाले होते, “मी सर्व भारतीयांना तीन मुलं जन्माला घालण्याचा सल्ला देईन. जगातील सर्व धर्मग्रंथ सांगतात की, ज्या देशांमध्ये जन्मदर तीनपेक्षा कमी असतो, ते हळूहळू नामशेष होतात. त्यामुळे तो दर तीनपेक्षा जास्तच राखला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे, डॉक्टर मला सांगतात की लग्नाला जास्त उशीर करू नये आणि तीन मुलं असण्याने आईवडील आणि मुलं दोघांचंही आरोग्य सुधारतं. तीन मुलं असलेल्या कुटुंबात मुलं आपापसातील अहंकाराचं व्यवस्थापन करायला शिकतात. त्यामुळे त्यांच्या कौटुंबिक जीवनात कोणताही अडथळा येत नाही.”

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us