Assam Election 2021 : ‘हिंसा हवी की शांती, घुसखोरी हवी की विकास?’ अमित शाहांचा मतदारांना सवाल

| Updated on: Mar 14, 2021 | 5:56 PM

केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे माजी अध्यक्ष अमित शाह यांनी आज आसामच्या मतदारांना संबोधित केलं. त्यावेळी त्यांनी आसामच्या जनतेला हिंसाचार आणि घुसखोरीच्या मुद्द्यावर भाजपकडे वळवण्यासाठी प्रयत्न केला.

Assam Election 2021 : हिंसा हवी की शांती, घुसखोरी हवी की विकास? अमित शाहांचा मतदारांना सवाल
Follow us on

नवी दिल्ली : देशातील 5 राज्यांच्या निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरु आहे. या 5 राज्यांमध्ये सर्वच राजकीय पक्षांचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. अशावेळी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे माजी अध्यक्ष अमित शाह यांनी आज आसामच्या मतदारांना संबोधित केलं. त्यावेळी त्यांनी आसामच्या जनतेला हिंसाचार आणि घुसखोरीच्या मुद्द्यावर भाजपकडे वळवण्यासाठी प्रयत्न केला.(Union Home Minister Amit Shah’s campaign rally in Assam Assembly elections)

विधानसभा निवडणुकीत पुढचं सरकार कुणाचं होईल, हे ठरवण्यासाठी आता आपण इथं जमले आहोत. काही दिवसातच आसामचं सरकार कोणत्या पक्षाकडे किंवा कोणत्या व्यक्तीच्या हाती असेल हे स्पष्ट होईल. अशावेळी तुमच्यासमोर 2 पर्याय आहेत. एक म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व आणि दुसरा पर्याय हा राहुल गांधी किंवा मौलाना बदरुद्दीन यांच्या नेतृत्वातील सरकार. त्यामुळे आसामच्या जनतेलाच ठरवायचं आहे की आसामचा विकास पंतप्रधान नरेंद्र मोदी करु शकतात, राहुल गांधी की मौलाना बदरुद्दीन? असा प्रश्न उपस्थित करत अमित शाह यांनी भाजप सरकारच आसामचा विकास करु शकतं, असा दावा केला आहे.

‘भूपेन हजारिकांना भाजप सरकारनेच सन्मानित केलं’

ही निवडणूक आसामचं भविष्य ठरवणारी आणि आसामला गौरव मिळवून देणारी आहे. आसाम आणि संपूर्ण नॉर्थ-ईस्टच्या मानसन्मानासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. संगीत क्षेत्रातील मोठं नाव भूपेन हजारिका यांना कुणीही सन्मानित केलं नाही, पण त्यांना ‘भारतरत्न’ने सन्मानित करण्याचं काम पंतप्रधान मोदी यांच्या सरकारने केलं आहे. आसाममध्ये 15 वर्षापर्यंत काँग्रेसचं सरकार राहिलं. पण आजपर्यंत भूपेन हजारिका यांचा सन्मान त्यांनी केला नाही, अशी टीकाही शाह यांनी केली.

‘काँग्रेसला घुसखोरांमध्ये व्होटबँक दिसते’

आसाममध्ये अनेक वर्षांपर्यंत काँग्रेसचं सरकार होतं. पण त्यांनी कधीही घुसखोरांना बाहेर काढलं नाही किंवा घुसखोरांना बाहेर काढण्याचा विचार तरी त्यांच्या मनात आला का? काँग्रेसला घुसखोरांमध्ये आपली व्होटबँक दिसते. पण आम्ही घुसखोरांना बाहेर काढू असं आश्वासन दिलं आणि हे काम जवळपास पूर्णही झालं आहे. आम्ही सांगितलं होतं की, आसामला दहशतवादापासून मुक्त करु आणि जवळपास 2 हजाराहून अधिक लोक शस्त्र टाकून मुख्य धारेत परत आले आहेत, असा दावाही शाह यांनी केलाय.

आसाममध्ये 3 टप्प्यात निवडणूक

आसाम विधानसभा निवडणूक 3 टप्प्यात होणार आहे. 27 मार्च , 1 एप्रिल आणि 6 एप्रिल असे हे टप्पे असणार आहेत. यावेळी आसाममध्ये एकीकडे भाजप, आसाम गण परिषद, यूनायटेड पिपल्स पार्टी लिबरल सोबत निवडणूक लढवत आहे. तर दुसरीकडे काँग्रेसने 6 पक्षांसोबत महाआघाडी केली आहे. त्यात बदरुद्दीन अजमल यांच्या नेतृत्वातील AIUDF सह BPF, CPI, CPI-M आणि आंचलिक गण मोर्चाचा सहभाग आहे.

संबंधित बातम्या :

Mamata Banerjee Injured : ममता बॅनर्जींवर हल्ला नाही तर अपघात! हल्ल्याचे पुरावे नाहीत- निवडणूक आयोग

ओडिशा विधानसभेत ‘हायव्होल्टेज ड्रामा’, भाजप आमदाराकडून सॅनिटायझर पिऊन आत्महत्येचा प्रयत्न, कारण काय?

Union Home Minister Amit Shah’s campaign rally in Assam Assembly elections