मटण, मासे खाण्यावर बंदी घाला… बागेश्वर बाबांच्या मागणीने खळबळ; राज्यातील वातावरण तापलं
बागेश्वर बाबा धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी पश्चिम बंगालमध्ये दुर्गा पूजेदरम्यान मटण, मासे खाण्यावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. या मागणीमुळे राज्यातील राजकारण तापले असून सांस्कृतिक परंपरेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अनेकांनी याला बंगाली संस्कृतीवरील हस्तक्षेप मानले आहे. भाजप आणि टीएमसी नेत्यांनीही यावर तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत, ज्यामुळे हा मुद्दा संवेदनशील बनला आहे.

दुर्गापूजा मंडपाच्या मागे काही लोक मटण, मासे खातात. हे लोक पाखंडी आहेत. नॉनव्हेज खाणं चुकीचं आहे. त्यामुळे राज्यात मटण आणि मासे खाण्यावर बंदी गाला. उत्सव काळात नॉनव्हेज खाणं बंद वर्ज्य करावं, अशी मागणी बागेश्वर धामचे मुख्य पुजारी धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांनी केली आहे. जन्माष्टमीच्या निमित्ताने बागेश्वर बाबा पश्चिम बंगालच्या लिलुआमध्ये आले होते. तीन दिवस ते पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर होते. बागेश्वर बाबा यांच्या या मागणीमुळे पश्चिम बंगालच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. विधानसभा निवडणुकीतही मांस मच्छिचा मुद्दा उपस्थित झाला होता. त्यातच आता बागेश्वर बाबांनी हा मुद्दा उपस्थित केल्याने या मुद्द्याला पुन्हा एकदा हवा मिळाली आहे.
कथावाचक बागेश्वर बाबांनी दुर्गा पूजेच्या दरम्यान दुर्गा मातेच्या मूर्तीच्या आसपास मांसाहारी भोजन करू नये, असं आवाहन केलं आहे. तसेच त्यांनी बंगालच्या हिंदुंना नवरात्री उत्सव साजरा करण्याचं आवाहनही केलं आहे. बागेश्वर बाबांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दुर्गा पूजेच्या दरम्यान मांसाहार करणं योग्य नाही. ते लोक अधर्मी असतात. त्यामुळे त्यांनी मांसाहा सोडलं पाहिजे, असं आवाहन त्यांनी केलं आहे.
बागेश्वर बाबा नेमकं काय म्हणाले?
हावडा येथे हनुमान कथेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी त्यांनी ही मागणी केली. दुर्गापुजेच्या मंडपाच्या मागे देवीच्या मूर्तीच्या आसपास नॉनव्हेज खाल्लं जातं. तसेच नॉनव्हेज बनवलं जातं आणि विकलंही जातं. ते सर्व बंद झालं पाहिजे. जे लोक मूर्तीच्या आसपास नॉनव्हेज खात, विकत असतील त्यांच्यावर बहिष्कार टाका, असं सांगतानाच बंगालमध्ये हिंदूंनी नवरात्रीच्या नियमांचं पालन केलं पाहिजे, असं आवाहनही त्यांनी केलं. यावेळी त्यांनी दुर्गापूजेच्या काळात मांस मच्छी खाणाऱ्यांना ढोंगी असं म्हटलं आहे. त्यामुळे वाद निर्माण झाला आहे.
मुद्दा संवेदनशील का?
पश्चिम बंगालमध्ये दुर्गापूजा केवळ धार्मिक उत्सव नाहीये, तर एक सामाजिक आणि सांस्कृतिक उत्सव आहे. बंगाली समाजातील एक मोठा वर्ग दुर्गा पूजे दरम्यान, खासकरून नवमीच्या दिवशी, मांसाहारी भोजन-मासे आणि मटणाला सामान्य संस्कृतीचा भाग मानतो. दरम्यान, प्रत्येक कुटुंब, समुदाय आणि पूजा समितीत वेगवेगळी प्रथा असते.
त्यामुळेच बागेश्वर बाबांची अपील अनेक लोकांनी धार्मिक शुचितेऐवजी व्यक्तीगत मतांपेक्षाही बंगाली परंपरेवर झालेल्या टिप्पणी म्हणून घेतली आहे. मंडप किंवा मूर्तीच्या जवळ मांसाहाराची विक्री होणं योग्य आहे की नाही? हा आता बंगालमधील चर्चेचा मुख्य केंद्रबिंदू ठरला आहे. तसेच कोणत्याही धार्मिक व्यक्तीला संपूर्ण समुदायाला खाण्यापिण्याच्या बाबत आदेश देण्याचा अधिकार आहे का? हा मुद्दा सुद्धा बंगालमध्ये चर्चेचा मुद्दा ठरला आहे.
राजकीय प्रतिक्रिया
या मुद्द्यावर सर्वाधिक लक्ष्यवेधी प्रतिक्रिया भाजपमधून आली आहे. भाजपचे पश्चिम बंगालचे अध्यक्ष शमिक भट्टाचार्य यांनी बागेश्वर बाबांच्या या आवाहनाचं समर्थन केलेलं नाही. बंगाली दुर्गा पूजेत काय खायचं आणि काय नाही? हे साधूसंत ठरवू शकत नाही. आष्टमीला लूची आणि नवमीला पांठेचं मांस खाण्याची इथली परंपरा आहे, असं शमिक भट्टाचार्य यांनी म्हटलं आहे.
टीएमसी खासदार सौगत रॉय यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. बागेश्वर बाबांबद्दल मला अधिक माहिती नाहीये. ते मध्य प्रदेशातील एका मंदिराचे प्रमुख आहे. त्यांच्याविषयी मला अधिक माहिती नाही. जर बाहेरचा व्यक्ती येऊन काही ठरवत असेल तर पश्चिम बंगालच्या स्वातंत्र्याचं काय होणार? लोक समितीच्या मनाप्रमाणे पूजा अर्चना करतील. ते नियमांचं पालन करतील. त्याच्याशी बागेश्वर बाबांचं काय घेणंदेणं आहे? असा सवाल सौगत रॉय यांनी केला आहे.