अमेरिका, इराण युद्धादरम्यान भारताला मोठा झटका; देशावर महासंकट, नव्या अंदाजानं झोप उडाली
अमेरिका आणि इराणमध्ये तात्पुरता युद्धविराम झाला आहे. मात्र अजूनही स्ट्रेट ऑफ होर्मूजमध्ये मोठा तणाव पहायला मिळत आहे. यातच आता भारतासंदर्भात एक मोठी बातमी समोर आली असून, त्यामुळे चिंता वाढली आहे.

इराण आणि अमेरिकेमध्ये तात्पुरता युद्धविराम झाला आहे. मात्र अजूनही स्ट्रेट ऑफ होर्मूजमध्ये तणाव कायम आहे. एकीकडे इराणने स्ट्रेट ऑफ होर्मूज व्यापारी जहाजांसाठी बंद केला आहे, तर दुसरीकडे अमेरिकेनं देखील या मार्गावर नाकेबंदी केली आहे. कच्च्या तेलाची वाहतूक आणि एलपीजी गॅससाठी हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे. जगाला जेवढ्या प्रमाणात कच्च्या तेलाची आणि गॅसची गरज लागते त्यातील तब्बल 25 टक्के वाहतूक या मार्गाने होते. हा मार्ग गेल्या अनेक दिवसांपासून वाहतुकीसाठी बंद असल्यामुळे संपूर्ण जगावर मोठं ऊर्जा संकट निर्माण झालं आहे. अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेला देखील मोठा फटका बसला आहे. एकीकडे इराण आणि अमेरिकेमुळे ऊर्जा पुरवठा बाधित झाला आहे तर दुसरीकडे यंदाच्या मान्सूवर अल निनोचा प्रभाव पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर भारतासमोर आला दुहेरी संकट निर्माण झालं आहे. एकीकडे स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद असल्यामुळे भविष्यात महागाई वाढण्याची शक्यता आहे. पेट्रोल, डिझेलचे दर वाढू शकतात. तर यंदा मान्सूनवर अल निनोचा प्रभाव राहणार आहे. हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार यावर्षी भारतात सरासरीच्या 92 टक्के एवढ्या पावसाचा अंदाज आहे. सुरुवातीला पावसाचं प्रमाण चांगलं असेल त्यामुळे खरीप हंगामात पिकाची लागवड होईल, मात्र ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. देशभरात अशीच परिस्थिती कायम राहणार असल्यानं, खरीप हगांमातील पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसून त्याचा थेट परिणाम हा जीडीपीवर होऊ शकतो अशी चिंता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान दिलासादायक बाब म्हणजे 2026-27 या आर्थिक वर्षामध्ये भारताचा जीडीपी चांगला राहील, असा अंदाज आयएमएफकडून वर्तवण्यात आला आहे. चालू आर्थिक वर्षात भारताचा जीडीपी 6.5 टक्क्यांच्या आसपास राहील असं आयएमएफने म्हटलं आहे. इतर काही देशांच्या जीडीपीमध्ये घट होणार असल्याचा अंदाज देखील आयएमएफकडून वर्तवण्यात आला आहे. मात्र जर दीर्घ काळ स्ट्रेट ऑफ होर्मूज वाहतुकीसाठी बंद राहिला आणि अल निनोचा प्रभाव मान्सूनवर दिसून आला तर मात्र अर्थव्यवस्थेला फटका बसू शकतो असा इशारा या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे.