बिहारच्या पोटनिवडणुकीत ट्विस्ट; भाजप उमेदवाराने घेतला अर्ज मागे, अचानक नेमकं काय घडलं?

Bihar news : बिहारच्या पोटनिवडणुकीत ट्विस्ट निर्माण झालाय. भाजप उमेदवाराने अचानक अर्ज मागे घेतला आहे.

बिहारच्या पोटनिवडणुकीत ट्विस्ट; भाजप उमेदवाराने घेतला अर्ज मागे, अचानक नेमकं काय घडलं?
| Updated on: Jul 10, 2026 | 6:36 PM

भाजप अध्यक्ष नितीन नबीन यांनी काही महिन्यांपूर्वी आमदारकीचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या बांकीपूर विधानसभा मतदारसंघातील जागेवर पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीत अचानक मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. या पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार अभिषेक कुमार सिन्हा यांनी माघार घेतली आहे. भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या मतदारसंघातून ऐनवेळी भाजप उमेदवाराने माघार घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

भाजप उमेदवार अभिषेक कुमार सिन्हा यांनी पत्रकार परिषद घेऊन अर्ज माघार घेत असल्याचे स्पष्ट केले. यावेळी अभिषेक कुमार यांनी कौटुंबिक कारणातून निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले. अभिषेक कुमार सिन्हा यांनी म्हटले की, ‘मी काही वेळापूर्वीच भाजपचे बिहार प्रदेशाध्यक्ष संजय सरावगी यांना एक पत्र दिलं आहे. त्यांना दिलेलं पत्र वाचून दाखवत आहे. भाजपने मला बांकीपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत एनडीएचा (NDA) उमेदवार म्हणून निवडले होते. मी पक्षाच्या केंद्रीय आणि राज्यातील नेतृत्वाचे आभार मानतो. मी सर्वांना नम्रपणे कळवू इच्छितो की, कौटुंबिक कारणामुळे मला विधानसभा पोटनिवडणूक लढवणे शक्य होणार नाही. परंतु मी पक्षाचा एक निष्ठावान कार्यकर्ता आहे. आधीसारखं पक्षाची प्रामाणिक सेवा करत राहीन’.

प्रशांत किशोर पोटनिवडणुकीच्या रिंगणात 

बांकीपूर पोटनिवडणुकीत लढतीची जोरदार चर्चा सुरू आहे. या पोटनिवडणुकीच्या जन सुराज पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर रिंगणात उतरले आहेत. त्यातदरम्यान भाजप (BJP) उमेदवार अभिषेक कुमार सिन्हा यांनी अर्ज मागे घेतल्याने पोटनिवडणुकीतील राजकीय समीकरण बदललं आहे.

13 जुलै रोजी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस

बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत 13 जुलै रोजी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. निवडणुकीच्या तोंडावर अभिषेक कुमार यांनी माघर घेतल्याने भाजपला नवीन उमेदवार शोधण्याची नामुष्की आली आहे. भाजपला 13 जुलैआधीच नव्या उमेदवाराच्या नावाची घोषणा करावी लागेल. भाजप आता कोणाला उमेदवारी देणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. भाजपच्या उमेदवाराने ऐनवेळी माघार घेतल्याने विरोधी पक्षाच्या उमेदवारांना दिलासा मिळालाय.

Follow Us