
बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप्रणित एनडीए आघाडीने शानदार विजय मिळवला आहे. आता जनतेला बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार याबाबत उत्सुकता लागली आहे. अशातच आता बिहारमधील सरकार स्थापनेबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. बिहारचा मुख्यमंत्री कोण असेल हे अद्याप जाहीर झालेले नाही. मात्र येत्या 3-4 दिवसांत कधीही बिहार सरकारचा शपथविधी सोहळा पार पडण्याची शक्यता आहे. या सोहळ्याला देशभरातील पाहुणे उपस्थित राहण्याची शक्यता आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 19 किंवा 20 नोव्हेंबरला बिहार सरकारचा शपथविधी सोहळा पार पडण्याची शक्यता आहे. या सोहळ्याच्या तयारीला सुरुवात करण्यात आली आहे. प्रशासनाने 17 ते 20 नोव्हेंबरपर्यंत पाटण्यातील गांधी मैदान जनतेसाठी बंद ठेवण्याचा आदेश जारी केला आहे. त्यामुळे या मैदानावर शपथविधी सोहळा पार पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या मैदानाभोवती पोलीस तैनात करण्यात आले आहेत. उद्यापासून ही सुरक्षा व्यवस्था आणखी वाढण्याची शक्यता आहे.
नितीश कुमार हे सध्या बिहारचे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या मंत्रिमंडळाची अखेरची बैठक सोमवारी सकाळी 11.30 वाजता होणार आहे. या बैठकीत राजीनाम्याचे प्रस्ताव मंजूर केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. या नंतर नितीश कुमार राज्यपालांना भेटून राजीनामा देण्याची शक्यता आहे. त्यानंतर नितीश कुमार पुन्हा एनडीएचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असण्याची शक्यता आहे. ते दहाव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची शक्यता आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपने सर्वाधिक 89 जागा जिंकल्या आहेत, तर जेडीयूने 85 ने 85 जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे आता भाजपला जास्त मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे. समोर आलेल्या माहितीनुसार सहा आमदारांमागे एक मंत्रिपद वाटले जाण्याची शक्यता आहे. यावर घटक पक्षांमध्ये एकमत झाल्याची माहिती समोर आली आहे. या गणितानुसार भाजपला 15/16, जेडीयूला 14, एलजेपी (आर) 3, आरएलएम 1 आणि एचएएम या पक्षाला 1 मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. आता भाजपकडू मंत्रिपदासाठी कोणत्या नेत्यांची वर्णी लागते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.