बिहारमध्ये भाजपा-जेडीयू युती तुटणार? अमित शाहांचा नितीश कुमारांना फोन, जेडीयू आणि राजदने आमदारांची आज बैठक

| Updated on: Aug 09, 2022 | 6:56 AM

Bihar Political Crisis : राष्टीय जनता दल आणि संयुक्त जनता दलाने (RJD and JDU) आज स्वतंत्रपणे आपआपल्या पक्षांच्या आमदारांची बैठक बोलावली आहे. सोमवारी नितीश कुमार यांनी फोनवर सोनिया गांधी यांच्याशीही चर्चा झाल्याची माहिती आहे.

बिहारमध्ये भाजपा-जेडीयू युती तुटणार? अमित शाहांचा नितीश कुमारांना फोन, जेडीयू आणि राजदने आमदारांची आज बैठक
नितीश कुमार, अमित शाह (फाईल फोटो)
Image Credit source: Google
Follow us on

पाटना : बिहारमध्ये भाजपा आणि संयुक्त जनता दलात निर्माण झालेल्या कटुतेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांना फोन करुन त्यांच्याशी चर्चा केली. या दोघांमध्ये सहा ते सात मिनिटे फोनवर चर्चा झाल्याची माहिती आहे. दुसरीकडे बिहार भाजपाचे अध्यक्ष संजय सायसवाल यांच्यासह वरिष्ठ नेते उपमुख्यमंत्री तारकिशोर प्रसाद यांच्या घरी एकत्र आले होते. यावेळी झालेल्या बैठकीबाबत काहीही सांगण्यास नेत्यांनी नकार दिला आहे. राज्यातील सध्याच्या राजकीय तणावाच्या स्थितीत पार पडलेली ही बैठक महत्त्वाची मानण्यात येते आहे. तर राष्टीय जनता दल आणि संयुक्त जनता दलाने (RJD and JDU) आज (मंगळवारी) सकाळी 11 वाजता स्वतंत्रपणे आपआपल्या पक्षांच्या आमदारांची बैठक बोलावली आहे. सोमवारी नितीश कुमार यांनी फोनवर सोनिया गांधी यांच्याशीही चर्चा झाल्याची माहिती आहे.

जदयू आणि राजद एकत्र येणार असल्याची चर्चा

जेडीयू आणि राजद हे आपआपल्या आघाडीतून 11 ऑगस्टपूर्वी बाहेर पडतील, अशा चर्चा सुरु आहेत. त्यानंतर पुन्हा राज्यात जेडीयू आणि राजदचे सरकार स्थापन होणार असल्याच्याही चर्चा सुरु आहेत. 11 ऑगस्टपूर्वी राज्यात नवे सरकार स्थापन होईल, असा दावा करण्यात येतो आहे.

बिहारच्या राजकारणातील टर्निंग पॉईंट – जेडीयू

बिहारच्या राजकारणात काहीही शक्य आहे, असे संकेत जेडीयूचे खासदार रामप्रीत मंडल यांनी सोमवारी दिल्लीत दिले होते. हा राज्याच्या राजकारणातील टर्निंग पॉईंट असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. आम्ही तिथे पोहचण्यापूर्वीच काहीही घडू शकते, असेही ते म्हणालेत. नितीशकुमार पक्षाचे नेते आहेत, तो जे निर्णय घेतील तो सगळ्यांना मान्य असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

हे सुद्धा वाचा

नितीशकुमार यांनी पुढाकार घ्यावा, राजद सोबत येईल

नितीश कुमार यांनी चर्चा करण्यासाठी पुढाकार घेतला तर त्यांना साथ देऊ असे राष्ट्रीय जनता दलाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. ऑफर मिळाली तर सरकारमध्ये सहभागी होणार का, या प्रश्नावर आम्ही जनतेसोबत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. जनतेच्या हितासाठी आणि दंगेखोरांचं सरकार रोखण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करणार असल्याचे राजदकडून स्पष्ट करण्यात आलेले आहे.

नितीशकुमार भाजपावर का नाराज

सरकार चालवण्यासाठी भाजपाकडून फ्री हँड मिळत नसल्याने नितीशकुमार नाराज असल्याची चर्चा आहे. गेल्या काही महिन्यांपासून महत्त्वाच्या बैठकांपासून नितीशकुमार बाजूला राहिलेले आहेत. काही महिन्यांपूर्वी पंतपधानांनी बोलावलेस्या कोरोनाबाबतच्या बैठकीतही ते सहभागी झाले नव्हते. रामनाथ कोविंद यांचा सत्कार आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या शपथविधी कार्यक्रमातही ते सहभागी झाले नव्हते. राज्यातील भाजपा नेत्यांशीही ते भेटत नसल्याची माहिती आहे. स्थानिक कार्यक्रमात जरी नितीशकुमार सहभागी होत असले तरी ते भाजपाच्या नेत्यांसोबत मात्र अंतर राखून आहेत.