17 खासदारांना सर्वात मोठा झटका… भाजपच्या मोठ्या निर्णयाने टेन्शन; दिल्लीत मोठ्या घडामोडी

टीएमसीमधून एनसीपीआयमध्ये सामील झालेल्या 17 खासदारांना भाजपने पक्षप्रवेश नाकारल्याने मोठा धक्का बसला आहे. हे खासदार भाजपमध्ये येणार असल्याची चर्चा होती, मात्र पश्चिम बंगाल भाजपने हे दावे फेटाळून लावले. यामुळे हे खासदार राजकीय कोंडीत सापडले असून, त्यांची अवस्था 'इकडे आड तिकडे विहीर' अशी झाली आहे.

17 खासदारांना सर्वात मोठा झटका... भाजपच्या मोठ्या निर्णयाने टेन्शन; दिल्लीत मोठ्या घडामोडी
narendra modi
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 15, 2026 | 2:53 PM

दिल्लीच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. ममता बॅनर्जी यांच्या टीएमसीमधून फुटून एनसीपीआयमध्ये प्रवेश करणाऱ्या 17 खासदारांची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे. हे सर्वच्या सर्व 17 खासदार भाजपमध्ये सामील होणार होते. या खासदारांनी तसं काल जाहीरही केलं होतं. पण मिळालेल्या सूत्रानुसार, आता भाजपने या खासदारांना आपली दारं बंद केली आहेत. या खासदारांना पक्षात घेणार नसल्याचं भाजपने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे या खासदारांची अवस्था इकडे आड, तिकडे विहीर अशी झाली आहे.

एनसीपीआयमधील 17 खासदार भाजपमध्ये येणार असल्याची दिल्लीत चर्चा होती. दुर्गा पूजेनंतर किंवा आधी या खासदारांचा भाजप प्रवेश होणार असल्याचं सांगितलं जात होतं. पण या चर्चांना आता पूर्णविराम देण्यात आला आहे. भाजपचे पश्चिम बंगालचे प्रदेश अध्यक्ष शमिक भट्टाचार्य यांनी या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. कुणाला तरी भाजपमध्ये प्रवेश करायचा आहे. म्हणून त्यांना प्रवेश दिला जाणार नाही. कुणाला काय वाटतं यावर भाजपमध्ये प्रवेश दिला जात नसतो, असं भट्टाचार्य यांनी स्पष्ट केलं आहे. बासुनिया ज्या भाजपबद्दल बोलत आहेत, ती काय मंगळ ग्रहावरची भाजप आहे का? असा सवालही त्यांनी केला आहे.

माझ्या माहितीनुसार तृणमूल वा एनसीपीआयमधून कोणीही भाजपमध्ये प्रवेश करत नाहीये. तृणमूलची सत्ता असताना या नेत्यांनी आणि खासदारांनी कशा पद्धतीने अत्याचार केले हे राज्यातील जनता विसरलेली नाहीये, असंही भट्टाचार्य यांनी म्हटलं आहे.

निवडणुकांमुळे?

राज्यात पालिका निवडणुका असतानाच या घडामोडी घडत आहेत. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात भट्टाचार्य यांनी प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले होते, एनसीपीआय हा नवीन पक्ष आहे. त्याची स्थापना नुकतीच झाली आहे. त्यांनी तृणमूलच्या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवली आणि विजय मिळवला होता. आता राजगमध्ये ते सामील झाले आहेत. त्यांचं स्वागत आहे. पण हे सर्व दिल्लीत झालं. कोलकात्यापासून दिल्ली सुमारे 1500 किलोमीटर दूर आहे. कोलकात्यापर्यंत पोहोचायला वेळ लागेल, असं सूचक विधान भट्टाचार्य यांनी केलं होतं.

भाजपने पश्चिम बंगालमध्ये आपल्या बळावर निवडणूक लढवली आणि सत्ता मिळवली. कुणाच्याही कृपेने आणि आशीर्वादाने सत्ता मिळवली नाही. आम्ही आमच्या विचारधारेशी तडजोडही केली नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

दावे प्रतिदावे

सोमवारी भाजपचे प्रवक्ता देबजीत सरकार यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली होती. एनसीपीआय खासदारांच्या विधानाबाबत आम्हाला जबाबदार धरलं जाऊ शकत नाही, असं देबजीत सरकार म्हणाले होते. तर, दुर्गा पूजेच्या आधी किंवा नंतर 17 खासदार भाजपमध्ये प्रवेश करतील. पक्षांतर बंदीचा निर्णय अयोग्य ठरवण्यासाठी आणि संभाव्य कारवाईपासून वाचण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं खासदार जगदीशचंद्र बासुनिया यांनी म्हटलं होतं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us