सीबीएसई इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची घोषणा काय ?

सीबीएसईच्या इयत्ता 12वीच्या OSM मूल्यांकन वादावर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी लक्ष घातले आहे. त्यांनी त्रुटी दूर करण्याची आणि पुनर्मूल्यांकन प्रक्रिया सुरू करण्याची जबाबदारी घेतली आहे. आयआयटीच्या मदतीने सुधारणा केल्या जातील. कोणत्याही विद्यार्थ्याचे प्रश्न अनुत्तरित राहणार नाहीत, असे आश्वासन त्यांनी दिले आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सीबीएसई इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची घोषणा काय ?
धर्मेंद्र प्रधान यांची मोठी मााहिती
| Updated on: May 28, 2026 | 12:41 PM

CBSE OSM Row : सीबीएसईच्या ओएसएम वादासंदर्भात, शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी त्रुटी दूर करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. पुनर्मूल्यांकन प्रक्रिया सुरू झाली आहे. आयआयटी कानपूर, आयआयटी मद्रास आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या मदतीने सुधारणात्मक उपाययोजना केल्या जातील. कोणत्याही विद्यार्थ्याची तक्रार न सोडवता तशीच सोडली जाणार नाही असं आश्वासन त्यांनी दिलं. त्यांचे प्रश्न, त्यांची जिज्ञासा अनुत्तरित राहणार नाही, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे 12वीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सीबीएसईच्या इयत्ता 12 वीच्या परीक्षेच्या मूल्यांकन प्रक्रियेवरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी बुधवारी सीबीएसई मुख्यालयात अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. या बैठकीत पुनर्मूल्यांकन आणि पडताळणी प्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या तांत्रिक आणि शुल्कासंबंधित समस्यांवर चर्चा करण्यात आली.

बैठकीनंतर शिक्षणमंत्री प्रधान यांनी निवेदन दिलं. सीबीएसईने इयत्ता 12वीच्या परीक्षांच्या पुनर्मूल्यांकनाची प्रक्रिया सुरू केली आहे. यावर्षी अंदाजे 17 लाख विद्यार्थी परीक्षेला बसले होते. एकूण 98 लाख उत्तरपत्रिका तपासण्यात आल्या, ज्यामध्ये अंदाजे 40 कोटी स्कॅन केलेल्या पानांचा समावेश होता.

डिजीटल मूल्यांकन प्रणाली पहिल्यांदाच लागू

“सीबीएसईने प्रथमच ऑन-स्क्रीन मार्किंग (OSM) नावाची डिजिटल मूल्यांकन प्रणाली लागू केली आहे”, असं धर्मेंद्र प्रधान यांनी स्पष्ट केलं. ” पारदर्शकता वाढवणे आणि ही प्रक्रिया, विद्यार्थी-केंद्रित करणे हाच याचा उद्देश असल्याचं” ते म्हणाले. “विद्यार्थी आता त्यांच्या स्कॅन केलेल्या उत्तरपत्रिका पाहू शकतात, त्यांचे गुण तपासू शकतात आणि कोणत्याही चुकांबद्दल प्रश्न विचारू शकतात. आतापर्यंत जवळपास 4 लाख विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्तरपत्रिका मिळाल्या आहेत, ज्यांच्या अंदाजे 11 लाख कॉपीज आहेत,” असं त्यांनी नमूद केलं.

 

काय आहे प्रकरण ?

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) इयत्ता 12वीचा निकाल जाहीर करून 15 दिवस उलटले तरी, हजारो विद्यार्थ्यांनी ऑन-स्क्रीन मार्किंग (OSM) या मूल्यांकन प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. 40 कोटी उत्तरपत्रिका कशा स्कॅन केल्या गेल्या, असा प्रश्न विद्यार्थ्यांनी विचारला होता. अस्पष्ट स्कॅन केलेल्या उत्तरपत्रिका मिळाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर सातत्याने केला. अनेक विद्यार्थ्यांनी तर असाही आरोप केला की, त्यांच्या पुरवणीच्या उत्तरपत्रिका हरवल्या. मात्र, सीबीएसईने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती.

40 कोटी पानं कशी केली स्कॅन ?

सीबीएसईच्या 12 वीच्या परीक्षेतला 17 लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते. ओएसएम (OSM) वापरून त्यांच्या 98 लाख उत्तरपत्रिका तपासण्यात आल्या, असं बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. बहुतेक उत्तरपत्रिका 35 ते 40 पानांच्या असतात. परीक्षेदरम्यान बहुतेक विद्यार्थी मुख्य उत्तरपत्रिका सादर केल्यानंतर 1 किंवा 2-3 पुरवण्या मागतात. त्यामुळे सरासरी, प्रत्येक विद्यार्थ्यामागे उत्तरपत्रिकांची संख्या सुमारे 40 पानांची होते. जर सर्व प्रती मोजल्या तर ४० कोटी पाने स्कॅन करावी लागली असतील. एकाच वेळी इतक्या प्रती आणि पाने कशी स्कॅन केली गेली, असे सवला लहानांपासून मोठ्यापर्यंत अनेकांनी विचारले.

मात्र आता या सर्व प्रश्नांवर, या सर्व दाव्यांवर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी स्पष्टीकरण दिलं असून कोणाचीही क्वेरी, त्यांचे प्रश्न अनुत्तरित राहणार नसल्याचं स्पष्ट केलं.

Follow Us