खासदार विशाल पाटील यांना मोठा धक्का, मिरज पंचायत समितीचे सभापतीपद रद्द, पुन्हा निवडणूक होणार
Miraj Panchayat Samiti : ईश्वरपूर नगराध्यक्ष पदापाठोपाठ मिरज पंचायत समितीचे सभापती पद अपात्र करण्यात आले आहे. खासदार विशाल पाटील यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.

सांगलीच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. ईश्वरपूर नगराध्यक्ष पदापाठोपाठ मिरज पंचायत समितीचे सभापती पद अपात्र करण्यात आले आहे. खासदार विशाल पाटील यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. मिरज पंचायत समितीच्या काँग्रेसच्या सभापती तन्वी कमलेकर यांचे सभापती पद रद्द करण्याचा निर्णय अतिरिक्त विभागीय आयुक्तांकडून घेण्यात आला आहे. तसेच या पदासाठी निवडणूक घेण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. तन्वी कमलेकर यांचे सभापती पद का रद्द करण्यात आले ते जाणून घेऊयात.
तन्वी कमलेकर यांचे सभापती पद रद्द
मिरज पंचायत समितीच्या काँग्रेसच्या सभापती तन्वी कमलेकर यांचे सभापती पद रद्द करण्यात आले आहे. सभापती पदाच्या निवडणुकीत अपारदर्शकता व सदस्य अपहरण प्रकरणी अतिरिक्त विभागीय आयुक्तांकडून ही कारवाई करण्यात आली आहे. भाजपाच्या कवलापूर पंचायत समिती सदस्य राणी भोरे यांनी याबाबत याचिका दाखल केली होती. तसेच सभापती पदाची निवडणूक पुन्हा घेण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
शिवसेनेच्या उमेदवाराचे झाले होते अपहरण
समोर आलेल्या माहितीनुसार, शिवसेनेच्या एका सदस्याच सभापती निवडणुकी दरम्यान अपहरणाचा झाल्याचा प्रकार समोर आला होता. त्यामुळे एका मताने महाविकास आघाडीच्या तन्वी कमलेकर यांची सभापती म्हणून निवड झाली होती. बहुमत असून देखील भाजपाला मिरज पंचायतसमिती मध्ये पराभव स्वीकारावा लागला होता, त्यानंतर राणी भोरे यांनी तक्रार दाखल केली होती, त्यानंतर आता त्यांचे पद अपात्र ठकवण्यात आले आहे.
जयंत पाटलांनाही धक्का
याआधी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनाही मोठा धक्का बसला होता. ईश्वरपूरचे लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदराव मलगुडे यांचं नगराध्यक्ष पद रद्द करण्यात आले होते. जिल्हाधिकारी मैनाक घोष यांच्याकडून मलगुडे यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यात आली आहे. अतिक्रमण व बांधकाम अनियमित प्रकरणी शिवसेनेच्या घनश्याम उर्फ जयकुमार जाधव यांनी याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणीनंतर मलगुडे यांचे रद करण्यात आले होते. आता तन्वी कमलेकर यांचे सभापतीपद रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे सांगलीच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
