Nitin Gadkari : LPG गॅस दिवसेंदिवस महाग होत असताना नितीन गडकरींनी सादर केली उत्तम स्वस्तातली टेक्नोलॉजी
सध्या देशात LPG गॅसचं संकट आहे. एलपीजी गॅस आधी जितक्या सहजतेने मिळायचा, तितक्या सहजतेने तो आता मिळत नाही. त्या शिवाय एलपीजीची किंमत दिवसेंदिवस महाग होत चालली आहे. या पार्श्वभूमीवर नितीन गडकरी यांनी एक उत्तम पर्याय लोकांसमोर सादर केला आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे नेहमीच सर्वसामान्यांचं जगणं अजून कसं सुसह्य होईल, त्यासाठी काय नवीन टेक्नोलॉजी आणता येईल यावर बोलत असतात. समस्येवर उपाय म्हणजे नितीन गडकरी. सध्या देशात LPG गॅसचं संकट आहे. देशाच्या काही भागात घरगुती गॅसची टंचाई निर्माण झाली आहे. सरकारकडून स्थिती सामान्य असल्याचं सांगण्यात येत आहे. पण स्ट्रेट ऑफ हॉर्मुज बाधित झाल्यामुळे अडचणी वाढल्या आहेत. भारतात जवळपास 85 टक्के घरगुती वापराचा गॅस आयात केला जातो. या दरम्यान केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी इथेनॉल-आधारित स्टोव टेक्नोलॉजी लॉन्च केली आहे. नागपूरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात गडकरी यांनी ही नवीन टेक्नोलॉजी सादर केली. कमर्शियल एलपीजी सिलेंडरच्या तुलनेत या स्टोववर जेवण बनवणं सोपं पडेल. सोबतच हा स्टोवर पर्यावरण अनुकूल आहे असा दावा नितीन गडकरी यांनी केला.
हा स्टोव म्हणजे भारताच्या वाढत्या बायोफ्यूल मिशनमध्ये एक महत्वाचा टप्पा आहे. ही स्टोव टेक्नोलॉजी पूर्णपणे स्वदेशी आहे. या स्टोवच वैशिष्ट्य म्हणजे हा स्टोवर पूर्णपणे इथेनॉलवर चालत नाही, इथेनॉलमध्ये पाणी मिसळल्यानंतर हा स्टोव काम करतो. या दोघांच्या मिश्रणातून एक स्वच्छ ऊर्जा निर्माण होते. ही टेक्नोलॉजी पारंपारिक LPG सिलेंडर्स आणि केरोसिनच्या तुलनेत सुरक्षित, कमी खर्चिक आणि प्रदूषण मुक्तीचा पर्याय देणारी आहे.
इथेनॉल ब्लेंडिंग प्रोग्रामचा उत्तम रिझल्ट
मागच्या दशकभरात भारतात इथेनॉल ब्लेंडिंग प्रोग्रामने उत्तम रिझल्ट दिले आहेत. वर्ष 2014 मध्ये पेट्रोलमध्ये इथेनॉलचं मिश्रण अवघं 1.5 टक्के होतं. सरकारी धोरणं आणि बायोफ्यूल क्षेत्रात पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झाल्याने वर्ष 2025 मध्ये हा आकडा 20 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. आतापर्यंत सरकारचा फोकस वाहनात इथेनॉल वापरावर होता. पण आता कुकिंग फ्यूल म्हणून वापर करण्याचा प्लान बनवला जात आहे.
गडकरी यांच्यानुसार ही टेक्नोलॉजी LPG सिलेंडरच्या तुलनेत खूप स्वस्त पडेल. त्यामुळे सामान्य कुटुंब आणि हॉटेल व्यावसायिकांचा खर्च कमी होईल.
केरोसिन, लाकूड आणि कोळशाच्या तुलनेत इथेनॉल पूर्णपणे स्वच्छ ऊर्जा आहे. कार्बन मोनोऑक्साइड आणि हायड्रोकार्बन उत्सर्जनाच प्रमाण नगण्य आहे. त्यामुळे घराच्या आत शुद्ध हवा राहते.
भारत जवळपास 85 टक्के कच्चं तेल आणि एलपीजी आयात करतो. दरवर्षी आयात बिलापोटी लाखो कोटी रुपये देशाबाहेर जातात. इथेनॉलमुळे हा आर्थिक ताण कमी होईल.