Chhattisgarh Naxal Attack : नक्षलवादी हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, ‘बलिदान व्यर्थ जाणार नाही’ शाहांचा गर्भित इशारा

| Updated on: Apr 05, 2021 | 2:33 PM

नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाचे 22 जवान शहीद झाले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी छत्तीसगडच्या जगदलपूर इथं जाऊन आज शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली.

Chhattisgarh Naxal Attack : नक्षलवादी हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, बलिदान व्यर्थ जाणार नाही शाहांचा गर्भित इशारा
नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत शहीद झालेल्या जवानांना अमित शाहांची श्रद्धांजली
Follow us on

नवी दिल्ली : छत्तीसगडमधील बीजापूर आणि सुकमा जिल्ह्याच्या सीमेवर नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलावर केलेल्या हल्ल्यानंतर केंद्रीय पातळीवर गृहमंत्रालयांच्या बैठकांचं सत्र सुरु झालंय. सरकार आता नक्षलवाद्यांविरोधात कठोर पावलं उचलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाचे 22 जवान शहीद झाले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी छत्तीसगडच्या जगदलपूर इथं जाऊन आज शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली. सैनिकांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही, अशा शब्दात अमित शाह यांनी नक्षलवाद्यांना एकप्रकारे गर्भित इशाराच दिलाय. (Amit Shah pays homage to Naxal attack martyrs, warns Naxalites)

‘नक्षलवादाविरोधात आमचा विजय निश्चित’

‘नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत शहीद झालेल्या जवानांना मी सरकार आणि समस्त देशवासियांकडून श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांचं हे बलिदान व्यर्थ जाणार नाही. आज आम्ही याबाबत एक बैठक घेतली. मी देशाला विश्वास देतो की ही लढाई थांबरणार नाही, तर अधिक वेगाने पुढे जाईल. शेवटी नक्षलवादाविरोधात आमचा विजय निश्चित आहे’, असा विश्वास शाह यांनी यावेळी व्यक्त केला.

सैन्याचं मनोबल कायम- शाह

गेल्या काही वर्षात नक्षलवादाविरोधात लढाई निर्णायक टप्प्यात पोहोचली आहे. या दूर्भाग्यपूर्ण घटनेनं ही लढाई आता अजून दोन पावलं पुढे नेली आहे, असंही अमित शाह म्हणाले. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांसोबत एक समिक्षा बैठक झाल्याचंही शाहांनी साांगितलं. यावेळी ही लढाई अधिक तीव्र करण्याचा मानस अधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय. त्यामुळे आमच्या सैन्याचं मनोबल कायम असल्याचंच यातून दिसून आल्याचं शाह म्हणाले.

नक्षलवाद्यांविरोधात आता ‘ऑपरेशन प्रहार-3’

छत्तीसगडच्या बिजापूर येथे नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत 22 जवान शहीद झाले. त्यामुळे नक्षलवाद्यांविरोधात आता मोठं अभियान हाती घेतलं जाणार आहे. नक्षलवाद्यांना जशास तसे प्रत्युत्तर देण्यासाठी सुरक्षा दल आता प्रहार-3 ही मोहीम हाती घेणार असून नक्षलवाद्यांचे टॉप 8 कमांडर रडावर आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नक्षलवाद्यांविरोधातील मोहीम अधिक गतीमान करण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी ह्युमन इंटेलिजन्स आणि टेक्निकल इंटेलिजन्सची मदत घेण्याचे आदेशही दिले आहेत. तसेच एनटीआरओ सुरक्षा एजन्सीची रिअल टाईम माहिती देऊन मदतही केली जाणार आहे.

टॉप आठ नक्षलवादी कमांडर

हिडमा
कमलेश ऊर्फ लछू
साकेत
मंगेसजी
रामजी
सुखलाल
मलेश

हे सर्वजण नक्षल्यांच्या विविध गटांचे कमांडर आहेत. हेच लोक सुरक्षा दलावर हल्ला करण्याची योजना आखत असतात. तसेच तरुणांना नक्षलवादी चळवळीकडे आकर्षित करण्याचा प्रयत्नही करत असतात. त्यामुळे या आठही टॉप कमांडरची सुरक्षा दलाने यादी तयार केली असून त्यांच्याविरोधात लवकरच मोठी मोहीम हाती घेतली जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

संबंधित बातम्या :

Chhattisgarh Naxal attack : एकाच हातावर दोन गोळ्या लागल्या, तरीही वीर जवान भिडला, कमांडरची डॅशिंग कहाणी

नक्षलवाद्यांविरोधात आता ‘ऑपरेशन प्रहार-3’; ‘हे’ 8 नक्षली कमांडर सुरक्षा दलाच्या रडारवर

Amit Shah pays homage to Naxal attack martyrs, warns Naxalites