Video : वायनाडमध्ये काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या कार्यालयाची तोडफोड, कार्यालयावर जबरदस्ती कब्ज्याचा आरोप

| Updated on: Jun 24, 2022 | 6:45 PM

केरळमधील वायनाडमध्ये काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. भारतीय युवक काँग्रेसने एका ट्विटमध्ये काँग्रेस कार्यालयाची तोडफोड केल्याचा आरोप केला आहे.

Video : वायनाडमध्ये काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या कार्यालयाची तोडफोड, कार्यालयावर जबरदस्ती कब्ज्याचा आरोप
काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी
Image Credit source: tv9
Follow us on

वायनाड : गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी (MP Rahul Gandhi) यांची नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी ईडी कडून चौकशी केली जात आहे. तर याविरोधात देशात अनेक ठिकाणी आंदोलने केली जात आहेत. काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून या कारवाईचा निषेध करत आहेत. याचदरम्यान खासदार राहूल गांधी याच्या मतदार संघात म्हणजेच वायनाडमधून (Wayanad) एक धक्कादायक प्रकार अघडकीस आला असून त्यांच्याच कार्यालायावर काही जणांनी हल्ला केल्याचे समोर आले आहे. तर त्यांनी राहुल गांधी यांच्या कार्यालयाची तोडफोड केल्याचंही उघड झालं आहे. या तोडफोडी मागे स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. पक्षाने सांगितले की, हातात झेंडे घेऊन एसएफआयचे कार्यकर्ते कार्यालयाच्या खिडक्यांवर चढले आणि त्यांची तोडफोड केली. खासदारांच्या कार्यालयात होत असलेली तोडफोड खालील व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे.

केरळमधील वायनाडमध्ये काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. भारतीय युवक काँग्रेसने एका ट्विटमध्ये काँग्रेस कार्यालयाची तोडफोड केल्याचा आरोप केला आहे. काँग्रेस नेते केसी वेणुगोपाली यांनी सांगितले की, आज दुपारी 3 च्या सुमारास एसएफआय कार्यकर्त्यांच्या आणि नेत्यांच्या एका गटाने वायनाडचे खासदार राहुल गांधी यांच्या कार्यालयावर जबरदस्तीने कब्जा करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी कार्यालयातील लोकांवर, राहुल गांधींच्या कर्मचाऱ्यांवर निर्दयीपणे हल्ला केला. याचे कारण आम्हाला माहीत नाही.

तसेच काँग्रेस नेते केसी वेणुगोपाल म्हणाले की, ते बफर झोनच्या मुद्द्यावर आंदोलन करत आहेत. या प्रकरणी राहुल गांधींची भूमिका काय आहे हे मला माहीत नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार त्या मुद्द्यावर काही करता आले तर ते केरळचे मुख्यमंत्री करू शकतात. तसेच वायनाडच्या सामान्य जनतेला पाहून राहुल गांधींनी मुख्यमंत्र्यांना त्यांच्या हस्तक्षेपासाठी पत्र लिहिले. त्यांनी पंतप्रधानांना पत्रही लिहिले आहे, पण हे SFI कार्यकर्ते राहुल गांधींच्या कार्यालयावर मोर्चा काढून हल्ला कसा करत आहेत हे समजत नाही.

पोलिसांच्या उपस्थितीत हा प्रकार घडल्याचा आरोप देखील त्यांनी केला. तसेच हे केरळच्या सीपीएम नेतृत्वाचे स्पष्ट षडयंत्र असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. गेल्या 5 दिवसांपासून ईडी त्यांची चौकशी करत आहे, त्यानंतर मला कळत नाही की केरळ सीपीएम नरेंद्र मोदींच्या मार्गावर जात काँग्रेस किंवा राहुल गांधी यांच्यावर हल्ला का करत आहे? तर सीताराम येचुरी आवश्यक ती कारवाई करतील असे मला वाटते. तर काँग्रेस नेते आणि आमदार टी सिद्दीकी यांनी हा हल्ला पूर्वनियोजित असल्याचा आरोप करत एसएफआयला ‘गुंड’ म्हटले आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

दरम्यान या हल्ल्यानंतर केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वायनाड येथील कार्यालयावर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असेही ते म्हणाले.