काँग्रेसच्या बड्या नेत्याचा मृत्यू; शीख दंगलीत होते दोषी
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सज्जन कुमार यांचं निधन झालं आहे. तिहार तुरुंगात शिक्षा भोगत असताना त्यांची प्रकृती खालावली होती. त्यामुळे त्यांना रुग्णालयात आणलं असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. 1984 च्या शीख विरोधी दंगलीतील त्यांची भूमिका आणि जन्मठेपेची शिक्षा यामुळे ते नेहमीच चर्चेत राहिले होते.

काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी खासदार सज्जन कुमार यांचं आज गुरुवारी निधन झालं आहे. रुग्णालयातील सूत्रांनी याबाबतची माहिती दिली आहे. सज्जनकुमार यांची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात आणण्यात आलं होतं. यावेळी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. सज्जन कुमार हे आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांशी झुंज देत होते. वडिलांच्या मृत्यूची खबर मिळताच त्यांचा मुलगा जग प्रवेश कुमार यांनी तातडीने सफदरजंग रुग्णालयात धाव घेतली. सज्जन कुमार हे 1984च्या शीख दंगलीशी संबंधित प्रकरणात दोषी आढळले होते. या प्रकरणात त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली होती. तिहार तुरुंगात ते शिक्षा भोगत होते.
सज्जन कुमार हे शीख विरोधी दंगलीशी संबंधित दोन प्रकरणात कारावास भोगत होते. एका प्रकरणात त्यांना दोषमुक्तही करण्यात आलं होतं. हे प्रकरण जनकपुरी परिसरातील हिंसेशी संबंधित होतं. या प्रकरणात दिल्ली कोर्टाने जानेवारी 2026मध्ये त्यांना दोषमुक्त केलं होतं. पुराव्याच्या अभावी सज्जन कुमार यांची निर्दोष मुक्तता करण्यात येत असल्याचं कोर्टाने म्हटलं होतं.
कोर्ट काय म्हणालं?
2013मध्ये लोअर कोर्टाने पालम कॉलनीच्या राजनगर पार्ट एकमधील 5 लोकांच्या हत्येच्या प्रकरणात त्यांना निर्दोष मुक्त केलं होतं. त्यानंतर डिसेंबर 2018मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने खालच्या कोर्टाचा निर्णय बदलला होता. यावेळी सज्जन कुमार हे गुन्हेगारी कट रजने आणि हत्येच्या प्रकरणात दोषी आढळले होते. त्यावेळी त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. ही शिक्षा सुनावताना कोर्टाने 1984च्या शीख विरोधी दंगली या मानवतावादा विरोधात असल्याचं म्हटलं होतं.
दोन प्रकरणात दोषी
2025मध्ये सज्जन कुमार हे आणखी एका प्रकणात दोषी आढळले होते. त्यांना शिक्षा सुनावण्यात आली होती. राऊत अव्हेन्यू कोर्टाने त्यांना दोषी करार केलं होतं. त्यावेळी जमावाने दोन लोकांची हत्या केली होती. त्यावेळी तक्रारदाराच्या वकिलाने सज्जन कुमार यांना फाशी देण्याची मागणी केली होती. पण कोर्टाने त्यांना जन्मठेप सुनावली होती. एका प्रकरणात निर्दोष मुक्त झाल्यानंतरही या दोन प्रकरणात ते शिक्षा भोगत होते.