मोदी-शाह स्वप्नपूर्तीच्या आणखी जवळ, पुदुचेरी ‘काँग्रेसमुक्त’; भारतात आता किती काँग्रेसशासित राज्य उरली?

| Updated on: Feb 22, 2021 | 2:42 PM

सध्याच्या घडीला देशातील केवळ पाच राज्यांमध्येच काँग्रेस पक्ष सत्तेत आहे. | Puducherry Floor Test

मोदी-शाह स्वप्नपूर्तीच्या आणखी जवळ, पुदुचेरी काँग्रेसमुक्त; भारतात आता किती काँग्रेसशासित राज्य उरली?
सहा आमदारांनी पक्षाला रामराम ठोकल्याने अल्पमतात आलेले पुदुचेरीतील काँग्रेस आणि द्रमुक आघाडीचे सरकार अखेर सोमवारी कोसळले.
Follow us on

मुंबई: सहा आमदारांनी पक्षाला रामराम ठोकल्याने अल्पमतात आलेले पुदुचेरीतील काँग्रेस (Congress) आणि द्रमुक आघाडीचे सरकार अखेर सोमवारी कोसळले. मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी (V Narayanasamy) यांना सोमवारी विधानसभेत विश्वासदर्शक ठरावावेळी बहुमत सिद्ध करण्यात अपयश आले. त्यामुळे काँग्रेसच्या हातातून आणखी एक राज्य गेले आहे. (Puducherry floor test Narayanasamy government fails to prove majority)

त्यामुळे नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी ‘काँग्रेसमुक्त भारत’ या स्वप्नाच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले आहे. सध्याच्या घडीला देशातील केवळ पाच राज्यांमध्येच काँग्रेस पक्ष सत्तेत आहे. महाराष्ट्र, पंजाब, राजस्थान, छत्तीसगढ, झारखंड या पाच राज्यांमध्येच काँग्रेस सत्तेत आहे. यापैकी पंजाब, राजस्थान आणि छत्तीसगढमध्येच काँग्रेस स्वबळावर सत्तेत आहे. तर महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये काँग्रेस पक्ष हा दुय्यम भूमिकेत आहे. त्यामुळे या दोन राज्यांतील परिस्थिती बदलल्यास काँग्रेसला सत्तेतून पायउतार व्हावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोदी-शाह जोडगोळीचा संकल्प आगामी काळात खरा ठरण्याची शक्यता पूर्णपणे नाकारता येणार नाही.

पुदुचेरीत काँग्रेस पुन्हा सत्तेत येणं अवघड?

पुदुचेरीत काँग्रेसचे सरकार कोसळले असले तरी एप्रिल-मे महिन्यात याठिकाणी पुन्हा विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. मात्र, या निवडणुकांमध्ये पुन्हा सत्तेत येणे काँग्रेससाठी अवघड बाब मानली जात आहे.

दिल्लीतील भाजपच्या चाणक्यांकडून पुदुचेरीची सत्ता मिळवण्यासाठी अगदी शांतपणे आणि विचारपूर्वक पावले टाकण्यात आली आहेत. आतापर्यंत काँग्रेसचे मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांनी नायब राज्यपाल किरण बेदी यांच्या दडपशाहीचा मुद्दा उपस्थित करुन वेळोवेळी सहानभूती मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, भाजपने किरण बेदी यांना नायब राज्यपाल पदावरुन दूर केल्याने काँग्रेसच्या हातातील हुकमी मुद्दाच काढून घेतला आहे.

तमिलसाई सुंदरराजन यांच्याकडे राज्यपालपद देण्याचा मास्टरस्ट्रोक

किरण बेदी यांच्याकडून पुदुचेरीच्या नायब राज्यपालपदाची सूत्रे काढून घेतल्यानंतर ही जबाबदारी तमिलसाई सुंदरराजन यांच्याकडे सोपवण्यात आली. त्यांच्याकडे सध्या तेलंगणाच्या राज्यपालपदाची जबाबदारीही आहे. मात्र, त्यांच्यावर पुदुचेरीची अतिरिक्त जबाबदारी देऊन भाजपने मास्टरस्ट्रोक खेळल्याची चर्चा आहे.

कारण तमिलसाई सुंदरराजन यांचे मूळगाव तामिळनाडूत आहे. पुदुचेरीतही तामिळ भाषिक मतदार आहेत. व्ही. नारायणस्वामी यांच्याप्रमाणे टी. सुंदरराजन यादेखील नाडर समाजाच्या आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत या गोष्टी भाजपसाठी फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे.

संबंंधित बातम्या:

मोठी बातमी: पुदुचेरीत काँग्रेसला मोठा धक्का; व्ही. नारायणसामींचे सरकार बहुमत चाचणीत अपयशी

(Puducherry floor test Narayanasamy government fails to prove majority)