Corona Vaccination : भारतीय बनावटीची लस विश्वासार्ह, अफवांना बळी पडू नका- पंतप्रधान

| Updated on: Jan 16, 2021 | 11:51 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना विश्वास देताना भारतीय बनावटीची लस विश्वासार्ह असल्याचं सांगितलं. तसंच लसींबाबत कुठल्याही अफवांना बळी पडू नका असं आवाहनही मोदी यांनी केलं आहे.

Corona Vaccination : भारतीय बनावटीची लस विश्वासार्ह, अफवांना बळी पडू नका- पंतप्रधान
Prime Minister Narendra Modi
Follow us on

नवी दिल्ली : भारतीय बनावटीच्या लसींवर काही प्रश्न उपस्थित केले जात होते. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना विश्वास देताना भारतीय बनावटीची लस विश्वासार्ह असल्याचं सांगितलं. तसंच लसींबाबत कुठल्याही अफवांना बळी पडू नका असं आवाहनही मोदी यांनी केलं आहे. आज जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मोदी यांनी देशवसियांशी संवाद साधला.(PM Narendra Modi claims that Indian-made vaccines are reliable)

“लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यातच आपण 3 कोटी आरोग्य सेवकांना लस देणार आहोत. दुसऱ्या टप्प्यात आलल्याला ही मोहीम 30 कोटी लोकांपर्यंत घेऊन जायची आहे. दुसऱ्या टप्प्यात वृद्ध नागरिकांना आणि फ्रन्ट लाईन कामगारांना लस दिली जाणार आहे. भारताची लसीकरण मोहीम खूप मोठी आहे. त्यामुळे ही मोहीम म्हणजे भारताच्या सामर्थ्याचं दर्शन म्हणावं लागेल. आपले शास्त्रज्ञांनी भारतीय बनावटीच्या दोन्ही लसीबाबत खात्री पटल्यानंतरच लसीच्या आपत्कालीन वापसाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे कुठल्याही अफवांना बळी पडू नका. जगभरातील 60 टक्के बालकांना ज्या लस दिल्या जातात. त्याची निर्मिती ही भारतातच होते. त्यामुळे भारतीय बनावटीच्या कोरोना प्रतिबंधक लसही विश्वासार्ह आहे”, असं पंतप्रधान मोदी यांनी आवर्जुन सांगितलं.

मानवीय आणि महत्वपूर्ण सिद्धांतांवर आधारीत मोहीम

“भारताची लसीकरण मोहीम मानवीय आणि महत्वाच्या सिद्धांतावर आधारित आहे. त्याला सर्वाधिक गरज आहे, जो कोरोना रुग्णांशी थेट संपर्कात आहे त्याला सुरुवातीला लस दिली जाणार आहे. डॉक्टर, नर्सेस, वॉर्डबॉय अशा आरोग्य कर्मचाऱ्यांना सर्वात आधी लस दिली जाणार. त्यानंतर देशाची रक्षा, कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आहे, सफाई कर्मचारी आदींना लस दिली जाणार आहे. त्या सर्वांच्या लसीकरणाचा खर्च केंद्र सरकार करेल. या लसीकरणाच्या तयारीसाठी राज्य सरकारांच्या सहकार्यानं ट्रायल्स, ड्राय रन केलं आहे. विशेष बाब म्हणजे CoWin अॅपद्वारे लसीकरण मोहीमेवर लक्ष दिलं जाईल,” असंही मोदी यांनी देशवासियांना संबोधित करताना सांगितलं.

लस घेतल्यानंतरही नियम पाळा- मोदी

“सर्व देशवासियांना पुन्हा सांगू इच्छितो की, कोरोना लसीचे दोन डोस घेणं अत्यंत गरजेचं आहे. एक डोस घेतल्यानंतर दुसरी लस घेण्यास विसरलो असं चालणार नाही. एक लस घेतल्यानंतर पुढे महिन्याभरानंतर दुसरी लस घेणं गरजेचं आहे. पहिला डोस घेतल्यानंतर 14 दिवसानंतर त्याचे परिणाम दिसायला लागतील. त्यामुळे लस घेतल्यानंतर लगेच बेजबाबदारपणे वागू नका. मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन सुरु ठेवा,” असं आवाहन पंतप्रधान मोदी यांनी देशवासियांना केलं आहे.

संबंधित बातम्या :

PM Narendra Modi : भारताची लसीकरण मोहीम म्हणजे प्राणाची आहुती दिलेल्या कोरोना योद्ध्यांना श्रद्धांजली- पंतप्रधान मोदी

कोरोनाचे दोन डोस घेणं बंधनकारक, हयगय करू नका; पंतप्रधान मोदींचं कळकळीचं आवाहन

PM Narendra Modi claims that Indian-made vaccines are reliable