दिल्लीतील आंदोलनावेळी परदेशातून पोस्ट? थेट पाकिस्तानातून… सायबर सेलचा मोठा खुलासा
Jantar Mantar Protest : अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वातील दिल्लीतील आंदलोनावेळी काही परदेशी शक्तींनी हस्तक्षेप केल्याचे समोर आले आहे. या आंदोलनाबाबत परदेशातून काही बनावट पोस्ट सोशल मीडियावर शेअर करण्यात आल्याचे समोर आले आहे.

नीट पेपरफुटीविरोधात कॉकरोच जनता पार्टीचे एक महिन्यापेक्षा जास्त कालावधीसाठी राजधानी दिल्लीत आंदोलन केले होते. धर्मेंद्र प्रधान यांनी शिक्षण मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर हे आंदोलन आता मागे घेण्यात आले आहे. अभिजीत दिपके यांच्या या आंदोलनाला देशातील विविध पक्षांसह संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. मात्र या आंदलोनावेळी काही परदेशी शक्तींनी हस्तक्षेप केल्याचे समोर आले आहे. भारताचा कट्टर शत्रू पाकिस्तानातून या आंदोलनाबाबत सोशल मीडियावर पोस्ट टाकण्यात आल्याचे समोर आले आहे. याबाबत सायबर सेलने माहिती दिली आहे.
परदेशातून पोस्ट…
महाराष्ट्र सायबर सेलचे अप्पर पोलीस महासंचालक यशस्वी यादव यांनी आज पत्रकार परिषद घेत कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनादरम्यान पाकिस्तान आणि मलेशिया या देशातून सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आल्या होत्या असा दावा केला आहे. सायबर सेलच्या या माहितीमुळे एकच खळबळ उडाली आहे. यशस्वी यादव यांनी नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.
महाराष्ट्र सायबर सेलकडून महत्त्वाची माहिती
यशस्वी यादव यांनी दिल्लीतील आंदोलनाबाबत बोलताना म्हटले की, ‘सोशल मीडिया हे जगभरात पोहोचण्याचे एक प्रभावी माध्यम आहे. जंतर मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान काही राष्ट्रविरोधी सोशल मीडिया अकाउंट एक्टिव्ह असल्याचं पाहायला मिळाल. महाराष्ट्र सायबर सेलने अशी काही सोशल मीडिया अकाउंट शोधली ज्यात देशाच्या बाहेरून काही पोस्ट टाकल्या जात होत्या.’
500 पेक्षा जास्त पोस्ट…
यादव यांनी सांगितले की, जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण करणारी ही अकाउंट होती. चार दिवसात 500 हून अधिक पोस्ट आम्ही शोधल्या. यातील 425 अशा पोस्ट आहेत ज्या संवेदनशील आहेत. 100 हून अधिक पोस्ट या पाकिस्तान, मलेशिया, इंडोनेशिया आणि सिंगापूर या देशातून या देशविरोधी पोस्ट टाकल्याच पाहायला मिळाल. या पोस्ट सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक्स, फेसबुक, इंस्टाग्राम आणि इतर माध्यमांवर अपलोड करण्यात आले होते. त्याचबरोबर जंतर-मंतरवर काही मुलांचा जीव गेला अशी बनावट पोस्ट देखील टाकण्यात आली होती असंही सायबर सेलकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सध्या या प्रकरणांचा तपास सुरू करण्यात आला आहे.
AI चे खोटे व्हिडिओ
मलेशियातून करण्यात आलेल्या काही पोस्टमध्ये भारतात अराजकता असल्याचा दावा करण्यात आला होता. काही AI द्वारे तयार करण्यात आलेल्या पोस्टमध्ये जंतर-मंतरवर कोट्यवधी लोक जमल्याचे सांगण्यात आले होते. त्याचबरोबर काही पोस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा दिल्याचा खोटी बातमीची प्रसारित करण्यात आली होती. तसेच काही केंद्रीय मंत्र्यांचे बनावट फोटोही प्रसारित करण्यात आल्याचे समोर आले आहे.