
दिल्लीतील बॉम्बस्फोटाने संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. अशातच आता देशातील 5 विमानतळे बाँम्बने उडवून देणार असल्याची धमकी मिळाली आहे. इंडिगो एअरलाइन्सला आज दुपारी 3.30 वाजता देशातील 5 आंतरराष्ट्रीय विमानतळांना बॉम्बने उडवण्याची धमकी देण्याबाबत मेल मिळाला आहे. या ईमेलमध्ये दिल्ली, मुंबई, चेन्नई, त्रिवेंद्रम आणि हैदराबाद या पाच विमानतळांना बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
दिल्ली बॉम्बस्फोटाचे प्रकरण ताजे असताना आता देशातील 5 विमानतळांना उडवून देण्याची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली आहे. या धमकीनंतर आता सगळीकडे खळबळ उडाली असून सविस्तर चौकशी सुरू करण्यात आली आहे. मात्र हा मेल कुणी आणि कुठून पाठवला हे अद्याप समजू शकलेले नाही.
मुंबईहून वाराणसीला जाणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली होती. त्यामुळे वाराणसीच्या लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावर हाय अलर्ट जारी करण्यात आला. या विमानाचे तातडीने आपत्कालीन लँडिंग करण्यात आले आणि सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले, त्यानंतर बॉम्ब निकामी पथकाने विमानाची कसून तपासणी केली. मात्र यात आतापर्यंत कोणतीही संशयास्पद वस्तू आढळलेली नाही.
या धमकीमुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत एअर इंडिया एक्सप्रेसच्या प्रवक्त्याने म्हटले की, ‘वाराणसीला जाणाऱ्या आमच्या एका विमानाला धमकी मिळाली होती. यानंतर आम्ही सरकारने नियुक्त केलेल्या बॉम्ब धोक्याचे मूल्यांकन करणाऱ्या समितीला तात्काळ माहिती दिली. तसेच सर्व आवश्यक उपाययोजना तातडीने राबविण्यात आल्या. विमान सुरक्षितपणे उतरले असून सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. आता सर्व प्रकारची तपासणी केल्यानंतर विमान उड्डाणासाठी सोडण्यात येईल.’
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर देशातील बहुतेक विमानतळांना हाय अलर्ट देण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळांवरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. विमानतळांच्या आत आणि बाहेर सीआयएसएफ आणि विमानतळ पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. श्वान पथके आणि बॉम्ब निकामी पथकांनाही सतर्क ठेवण्यात आले आहेत. कोणताही धोका टाळण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.