शाळेत बाहेरील व्यक्तींच्या प्रवेशावर बंदी; युट्यूबर, सोशल मीडिया इन्फ्लुएंसरलाही नो एन्ट्री, होणार कडक कारवाई
मोठी बातमी समोर येत आहे. आता जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये बाहेरील व्यक्तींना अनधिकृत प्रवेश करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. बाहेरील व्यक्तीच्या शाळेतील प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे.

उत्तर प्रदेशमधून मोठी बातमी समोर येत आहे. अयोध्या जिल्ह्यात आता जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये बाहेरील व्यक्तींना अनधिकृत प्रवेश करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. बाहेरील व्यक्तीच्या शाळेतील प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. यासंदर्भात प्राथमिक शिक्षण अधिकारी लालचंद यांनी आदेश जारी केला आहे. नव्या आदेशानुसार आता कुठल्याही शाळाबाह्य व्यक्तीला शाळांमध्ये अनाधिकृत पद्धतीने प्रवेश करता येणार नाहीये, तसेच सोशल मिडीयाशी संबंधित व्यक्ती आणि यु-ट्यूबर यांच्या देखील शाळा प्रवेशावर प्रतिबंध घालण्यात आला आहे. शाळेत किंवा शाळा परिसरात अनाधिकृतरित्या फोटो किंवा व्हिडओ काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. जर एखाद्या व्यक्तीला किंवा यु-टूबरला शाळेत प्रवेश करायचा असेल तर त्यासाठी आता त्याला प्राथमिक शिक्षण अधिकारी किंवा त्यांच्या समकक्ष अधिकाऱ्याची परवानगी घ्यावी लागणार आहे, त्याशिवाय शाळेत प्रवेश मिळणार नाहीये. एवढंच नाही तर शाळा आणि शाळा परिसरात अनाधिकृतरित्या फोटो किंवा व्हिडीओ काढण्यास देखील मनाई करण्यात आली आहे.
जो नियमांचं उल्लंघन करेल त्यावर कडक कारवाई केली जाणार आहे, तसेच सर्व शाळांनी या नियमांचं काटेकोरपणे पालन करावं, असं देखील या आदेशात म्हटलं आहे. सोशल मीडियाशी संबंधित लोक शाळेचे, तेथील शिक्षकांचे फोटो, व्हिडीओ तयार करून सोशल मीडियावर टाकतात, त्यामुळे अध्यापनाच्या कामामध्ये अडथळे निर्माण होतात. यामुळे शिक्षण क्षेत्र बदनाम होत आहे, असंही या आदेशात म्हटलं आहे. दरम्यान सरकारी शाळांचे मूल्यमापन करण्यासाठी आधीच प्रशासकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे, हे अधिकारी वेळोवेळी शाळांना भेटी देऊन, तेथील समस्या जाणून घेत असतात, आणि त्यानंतर त्या समस्येवर मार्ग काढला जातो, असंही शिक्षण विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं आहे.
या नव्या निर्णयामुळे आता शिक्षकांच्या अध्यापन कार्यात कोणताही अडथळा निर्माण होणार नाही, शिकवणे आणि शिक्षणे या दोन्ही गोष्टी सुरळीत सुरू राहतील असं जिल्हा प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं आहे. या नव्या निर्णयामुळे आता कोणालाही शाळेत अनधिकृत प्रवेश करता येणार नाहीये.