खेला होबे! ममता बॅनर्जी मैदानात, नवीन पक्षाचे नाव आणि चिन्ह काय? निवडणूक आयोगाला सोपवली यादी
TMC Mamata Banerjee: पोट निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस पक्ष आणि चिन्ह गोठवले. त्याला कडाडून विरोध करतानाच ममता बॅनर्जी यांनी मोठी खेळी खेळली. निवडणूक आयोगाला यादी सोपवली.

पश्चिम बंगालमध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाने मोठी भूमिका घेतली. नंदीग्राम आणि रेजीनगर विधानसभा पोटनिवडणूक तोंडावर आहे. त्या पार्श्वभूमीवर आयोगाने ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस (AITC)पक्षाचे नाव आणि जोडफूल असलेले चिन्ह तात्पुरते गोठवले आहे. ममता बॅनर्जी आणि फुटीरनेते ऋतब्रत बॅनर्जी यांच्यात पक्षाची मालकी आणि पक्ष चिन्हावरून वाद सुरू होता. न्यायालयीन आणि प्रशासकीय वादात निवडणूक आयोगाने अंतरिम आदेश दिला. आता दोन्ही पक्षांना चिन्हाचा पर्याय द्यावा लागणार आहेत. त्यात ममता बॅनर्जी यांनी आघाडी घेतली आहे. त्यांनी अंतिम यादी सोपवली आहे.
कडाडून विरोध आणि यादीही सोपवली
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या 14 पानी अंतरिम आदेशानंतर ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेसने त्याला कडाडून विरोध केला. तर त्याचवेळी पक्षाची तीन नवीन नावे आणि तीन चिन्हांचा हंगामी पर्याय सुद्धा समोर येत आहे. आयोगाच्या नियमानुसार, पक्षाला मूळ तृणमूल काँग्रेस या नावाशी संबंधित पर्याय सुचवता येणार होते. त्याआधारे ममता बॅनर्जी तीन कोणती नावं समोर करणार याची उत्सुकता आहे.
पक्षाची तीन नावं : ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस(ममता बॅनर्जी), तृणमूल काँग्रेस(ममता), तृणमूल काँग्रेस या नावाची शक्यता वर्तवली जात आहे.
पक्षाची तीन चिन्ह: आयोगाच्या उपलब्ध फ्री सिंबल्समधून बशी, फुटबॉल आणि टॉर्च ही तीन चिन्हं सुचवण्यात येऊ शकतात.
पक्षफुटीचा मोठा फटका
2026 मधील विधानसभा निवडणुकीतील मोठ्या पराभवानंतर तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली. ऋतब्रत बॅनर्जी आणि अरूप रॉय या गटाने बहुसंख्य आमदारांच्या पाठिंब्याचा दावा करत स्वतःला खरी तृणमूल काँग्रेस असल्याचा दावा केला. तर ममता बॅनर्जी याच पक्षाच्या संस्थापक असल्याने पक्ष आणि चिन्ह हे त्यांच्याकडे असावे असा दावा करण्यात आला. दोन्ही गटांकडून दावे आल्यानं आगामी पोटनिवडणुकीपूरते नवीन नाव आणि चिन्हांआधारे निवडणूक लढवण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत.
बंगालमध्ये पोटनिवडणूक कधी?
पश्चिम बंगालमधील रेजीनगर आणि नंदीग्राम विधानसभा जागांसाठी पोट निवडणूक होत आहे. 6 ऑक्टोबर रोजी पोटनिवडणूक होईल. नंदीग्राम विधानसभा मतदारसंघ मुख्यमंत्री शुभेंद्रु अधिकारी यांनी सोडल्यानंतर तिथे पोटनिवडणूक होत आहे. सध्याच्या आयोगाचा निर्णय या पोटनिवडणुकीपूरता असल्याचे सांगितले जात आहे. विधानसभा निवडणुकीत जबरदस्त पराभवानंतर जूनमध्ये 58 फुटीर आमदारांनी ऋतब्रत बॅनर्जी यांना त्यांचा गटनेता जाहीर केले. विधानसभा अध्यक्षांनी या गटाला मान्यता दिली आहे. तर काकोली घोष दस्तीदार यांच्या नेतृत्वात 20 खासदारांनी ममता गटाशी नाते तोडले आहेत. हा गट त्रिुपरामधील NCPI मध्ये विलीन झाला आहे.