VIDEO : राज्यसभेच्या शेवटच्या भाषणात गुलाम नबी गहिवरले, राज्यसभेत शांतता, आझाद फक्त बोलत राहीले

| Updated on: Feb 09, 2021 | 3:31 PM

काँग्रेसेचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांचा आज राज्यसभेतला शेवटचा दिवस होता (Ghulam Nabi Azad last speech of Rajya Sabha)

VIDEO : राज्यसभेच्या शेवटच्या भाषणात गुलाम नबी गहिवरले, राज्यसभेत शांतता, आझाद फक्त बोलत राहीले
Follow us on

नवी दिल्ली : काँग्रेसेचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांचा आज राज्यसभेतला शेवटचा दिवस होता. ते राज्यसभेत गेल्या सहा वर्षांपासून विरोधी पक्षनेते म्हणून भूमिका निभावत होते. या कालखंडात त्यांच्या राजकीय आयुष्यात बरेच उतार-चढाव आले. मात्र, त्यांचा आक्रमकपणा कायम लक्षात राहील असाच आहे. राज्यसभेत निवृत्त होत असताना त्यांनी आज शेवटचं भाषण केलं. यावेळी ते भावूक झाले. त्यांच्या या भाषणावेळी राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक दिग्गज उपस्थित होते (Ghulam Nabi Azad last speech of Rajya Sabha).

गुलाम नबी नेमकं काय म्हणाले?

“मी त्या भाग्यशाली लोकांपैकी एक आहे जे पाकिस्तान कधीच गेले नाहीत. जेव्हा मी तिथली परिस्थिती वाचतो, तेव्हा मला प्रचंड वाईट वाटतं. याशिवाय मला अभिमान वाटतो की, मी एक हिंदुस्तानी मुसलमान आहे. जगभरात जर कोणत्या मुसलमानांचा गौरव व्हायला हवा तर तो हिंदुस्तानच्या मुसलमानांचा व्हायला हवा”, असं गुलाम नबी म्हणाले.

“मी महात्मा गांधी, पंडीत जवाहरलाल नेहरु आणि मौलाना आझाद यांच्याकडे बघून देशभक्ती शिकलो आहे. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी आणि संजय गांधी यांचा खरंच खूप आभारी आहे. कारण त्यांच्यामुळेच आज मी इथपर्यंत पोहोचलो”, असं आझाद म्हणाले.

“काश्मीरची परिस्थिती आधी वेगळी होती. मात्र, आता वेगळी आहे. हळूहळू बदल होत गेला. मी काश्मीरमधील सर्वात मोठ्या आणि नामांकित कॉलेजमध्ये शिक्षण घेतलं. तिथे 14 आणि 15 ऑगस्ट हे दोन्ही दिवस साजरी केले जात होते. मात्र 14 ऑगस्ट हा पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिवस साजरा करणाऱ्यांची संख्या जास्त होती. मी आणि माझे काही जोडीदार 15 ऑगस्ट साजरी करायचो. त्यावेळी भारताचा स्वातंत्र्यदिन साजरा करणाऱ्यांची संख्या फार कमी होती. कॉलेजमध्ये 15 ऑगस्ट साजरी केल्यानंतर आम्ही एक आठवडा कॉलेजला जायचो नाही. कारण दुसऱ्या दिवशी गेलो तर मार खावा लागला असता. त्या दिवसांच्या संघर्षांपासून आज इथपर्यंत येऊन पोहोचलो आहे”, असं गुलाम नबी यांनी सांगितलं.

“माजी दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात काम करताना चांगलं सहकार्य लाभलं. वाजपेयी यांच्यामुळे संसदेत उत्साहाचं वातावरण असायचं”, अशी आठवण त्यांनी सांगितलं (Ghulam Nabi Azad last speech of Rajya Sabha).

“गेल्या 30-35 वर्षांत अफगाणिस्तानपासून इराणपर्यंत , गेल्या काही वर्षात मुस्लिम देश एकमेकांविरोधात लढाई करत संपत आहेत. तिथे कुणी हिंदू किंवा ख्रिस्ती नाही. ते आपसातच लढत आहेत. पाकिस्तानच्या समाजात ज्या वाईट गोष्टी आहेत, त्या आपल्या भारताच्या मुस्लिम समाजात कधीच येऊ नये”, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

“संसदेत विरोधी पक्षनेता असल्याने विरोधकांसोबत अनेकदा वाद, मतभेद झाले. मात्र, त्यागोष्टी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कधीही वैयक्तिक अंगावर घेतल्या नाहीत. आपल्या सगळ्यांना मिळून देशाला पुढे जायचं आहे”, असं गुलाम नबी म्हणाले.

राज्यसभेत बोलताना गुलाम नबी आझाद यांना गहिवरुन आलं. काश्मीरी पंडीत आणि त्यांच्या संसदीय कार्यकाळाबाबत बोलताना ते म्हणाले,

गुजर गया वो जो छोटा सा ये फसाना था
फूल थे चमन था आशियाना था
न पूछ उजड़े नशेमन की दास्तां
चार दिन का ही था, मगर था तो आशियाना ही था..

काश्मीरच्या सध्यस्तीतीवर बोलताना गुलाम नबी म्हणाले,

दिल ना-उमीद तो नहीं नाकाम ही तो है
लम्बी है ग़म की शाम मगर शाम ही तो है

यावेळी त्यांनी त्यांच्या सहकार्याना सांगितलं, संसदेत आता भेट होणार नाही. मात्र, बाहेर नक्की भेटी होत राहतील. ते म्हणाले,

बदलेगा न मेरे बाद भी मौज़ू-ए-गुफ़्तुगू
मैं जा चुका हूं फिर भी तिरी महफ़िलों में हूं

यावेळी त्यांनी राज्यसभचे सभापती आणि सदस्यांचे आभार मानले. ते अखेर म्हणाले,

नहीं आएगी याद तो बरसों नहीं आएगी, मगर जब याद आएगी तो बहुत याद आएगी

हेही वाचा : ‘मी नशीबवान, मला पाकिस्तानात जावं लागलं नाही’, निरोपाच्या भाषणात गुलाम नबी आझाद भावूक