
नेपाळ म्हणजेच जनकपूर देवी सीता मातेची जन्मभूमी आहे. नेपाळमधून भगवान रामसाठी तीन हजारांपेक्षा जास्त भेटवस्तू आल्या आहेत. त्यात चांदीचे बूट, विविध प्रकाराचे दागिने, कपडे यांचा समावेश आहे. जनकपूरवरुन तीन वाहनांच्या ताफ्यातून या भेटवस्तू येत आहेत.

श्रीलंकेतून एक प्रतिनिधीमंडळ अशोक वाटिकामधून विशेष भेटवस्तू घेऊन येत आहे. रामायणात वर्णन असलेली अशोक वाटिकेतील शिळा घेऊन हे मंडळ येत आहे. रावणाने सीता मातेचे अपहरण करुन अशोक वाटिकेत ठेवले होते. त्या ठिकाणीची शिळा घेऊन हे प्रतिनिधी येत आहेत.

गुजरातमधील वडोदरा येथून 108 फूट लांब अगरबत्ती येत आहे. सहा महिन्यांपासून ही अगरबत्ती तयार करण्याचे काम सुरु होते. या अगरबत्तीचे वजन 3,610 किलोग्रॅम आहे. 3.5 फूट रुंद ही अगरबत्ती आहे. ही अगरबत्ती दीड महिन्यापर्यंत चालणार आहे. अगरबत्तीचा सुंगध अनेक किलोमीटर लांब जाणार आहे. ही अगरबत्ती करण्यासाठी 376 किलो गुग्गल, 376 नारळ, 190 तूप, 1,470 गायीचे शेण, 420 जडीबुटीचा वापर केला.

गुजरातमधील दरियापूर येथून अखिल भारतीय दबगर समाजाने तयार केलेला नगाडा (मंदिराचा ढोल) येणार आहे. मंदिराच्या प्रांगणात हा नगाडा असणार आहे. त्याच्यावर सोन्याचा मुलामा लावण्यात आला आहे. यामुळे मंदिरात येणाऱ्या प्रत्येक भाविकाचे लक्ष या नगाडाकडे जाणार आहे.

सुरतमधून सीता मातेसाठी केलेली विशेष साडी येत आहे. या साडीवर भगवान राम आणि अयोध्येतील मंदिराची प्रतिमा आहे. ही साडी तयार करण्यासाठी 5,000 अमेरिकी डायमंड आणि 2 किलो चांदीचा वापर करण्यात आला आहे. 35 दिवस काम करुन चाळीस कारागिरींनी ही साडी तयार केली आहे.

उत्तर प्रदेशातील अलीगढ चावी आणि कुलूपासाठी प्रसिद्ध आहे. अलीगढमधून जगातील सर्वात मोठा कुलूप आणी चावी येत आहे. 10 फूट उच, 4.6 फूट रुंद आणि 9.5 इंच जाड असलेल्या या कुलूप किल्लीचे वजन 400 किलो आहे. मंदिरात प्रतीकात्मक कुलूप म्हणून हे ठेवण्यात येणार आहे.