संकटात संकट… गुरुग्राम अचानक अंधारात… 7 वीज केंद्र ठप्प, रॅपिड मेट्रोला ब्रेक; अनेक परिसरात काळाकुट्ट काळोख
गुरुग्राममध्ये अचानक मोठा वीजपुरवठा खंडित झाला. एका मुख्य ट्रान्सफॉर्मर बिघाडामुळे 7 वीज केंद्र बंद पडली, ज्यामुळे शहराच्या मोठ्या भागात अंधार पसरला. रॅपिड मेट्रो सेवा ठप्प झाली आणि कामावरून परतणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.

आधीच देशात इंधनाची टंचाई आणि घरगुती गॅसची टंचाई सुरू आहे. त्यामुळे महागाईचा आगडोंब उसळल्याने सामान्य माणूस होरपळून पोळून निघाला आहे. हे संकट असतानाच हरियाणाच्या गुरुग्राममध्ये आज भलतंच संकट उभं राहिलं. अचानक गुरुग्राम अंधारात गेलं. 7 वीज केंद्र ठप्प झाल्याने गुरुग्राममध्ये काळाकुट्ट अंधार पसरला होता. रात्रीच्या वेळी घडलेल्या या प्रकारामुळे लोक उकाड्याने हैराण झाले. त्यामुळे लोकांचे जत्थेच्या जत्थे घरांच्या बाहेर जमा झाले. वीज केंद्र ठप्प झाल्याने केवळ घरांमधील वीज गायब झाली नाही. तर रॅपिड मेट्रोही जागेवरच थांबली. वीज नसल्याने मेट्रो बंद पडल्या. त्यामुळे कामावरून घरी जाणाऱ्यांचे प्रचंड हाल झाले.
हरियाणाच्या गुरुग्रामधील सेक्टर-72 येथील 220 KVA वीज केंद्राचा मुख्य ट्रान्सफॉर्मर खराब झाल्याने शहरातील वीज पुरवठा खंडीत झाला. ट्रान्सफॉर्मर खराब झाल्याने एकसाथ सात वीज केंद्र बंद पडले. त्यामुळे हजारो लोकांच्या घरात अंधार निर्माण झाला. ऐन गर्मीच्या दिवसात वीज नसल्याने पंखे, एसी आणि कुलर बंद पडले. त्यामुळे लोकांना हवा घेण्यासाठी घराच्या बाहेर येऊन थांबावे लागले आहे.
मेट्रो बंद
वीज संकटाचा रॅपिड मेट्रोवरही परिणाम झाला आहे. गेल्या दीड तासापासून रॅपिड मेट्रो सेवा बंद आहे. या मेट्रोतून रोज हजारो लोक प्रवास करत असतात. अशावेळी सेवाच बंद झाल्याने प्रवाशांना अडचणीचा मोठा सामना करावा लागला आहे. अनेक स्टेशनांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. मेट्रोच नसल्याने लोक खासगी वाहने करून घराकडे रवाना होत आहेत.
ही वीज केंद्र बंद
मुख्य ट्रान्सफार्मरमध्ये खराबी झाल्याने सेक्टर-15, सेक्टर-38, सेक्टर-44, सेक्टर-46, सेक्टर-52, सेक्टर-56 आणि मारुती 66 KVA वीज घर बंद पडले. त्यामुळे सेक्टर-38 पासून ते सेक्टर-57 पर्यंतच्या मोठ्या भागात वीज पुरवठा पूर्णपणे बंद झाला.
त्याशिवाय सेक्टर-15 पार्ट-1, सेक्टर-15 पार्ट-2 आणि सेक्टर-18 मध्येही बऱ्याच काळापासून वीज नसल्याने लोकांना मोठा त्रास झाला. प्रचंड उकाडा असतानाच वीज पुरवठा खंडीत झाल्याने अनेक घर, दुकाने आणि कार्यालयांवर त्याचा परिणाम झाला.
वैतागले…
अचानक बत्ती गुल झाल्याने लोकांना उकाड्याचा सामना करावा लागला. याशिवाय वीज पुरवठा नसल्याने त्याचा पाणी पुरवठ्यावरही परिणाम झाला आहे. स्थानिक रहिवाशी सातत्याने वीज विभागाच्या संपर्कात असून परिस्थितीची माहिती घेत आहेत. तसेच वीज कधी सुरू होणार याचीही विचारणा करत आहेत.