पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबांना एनएसईकडून मदतीचा हात, प्रत्येकी चार लाखांची मदत

एनएसईकडून या दहशतवादी हल्ल्यामध्ये ज्यांचा मृत्यू झाला आहे, त्यांच्या कुटुंबाला प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. तसेच या पीडित कुटुंबांना जास्तीत जास्त मदत करून एकजूट दाखवण्याचं आवाहनही यावेळी एनएसईकडून करण्यात आलं आहे.

पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबांना एनएसईकडून मदतीचा हात, प्रत्येकी चार लाखांची मदत
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 12, 2025 | 10:02 PM

22 एप्रिल 2025 ला पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला होता, या दहशतवादी हल्ल्यामध्ये 26 जणांचा मृत्यू झला तर अनेक जण जखमी झाले होते. या हल्ल्यात मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबांसाठी आता नॅशनल स्टॉक एक्सचेंजनं मदतीचा हात पुढे केला आहे. पहलगामध्ये दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबासाठी मदत म्हणून एनएसईकडून एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे.

या अतंर्गत एनएसईकडून या दहशतवादी हल्ल्यामध्ये ज्यांचा मृत्यू झाला आहे, त्यांच्या कुटुंबाला प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. तसेच या पीडित कुटुंबांना जास्तीत जास्त मदत करून एकजूट दाखवण्याचं आवाहनही यावेळी एनएसईकडून करण्यात आलं आहे.

यावेळी बोलताना एनएसईचे संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आशीष चौहान यांनी म्हटलं आहे की, या आव्हानात्मक काळात आम्ही पीडित कुटुंबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. हा देशासाठी एक दु:खाचा क्षण आहे. आम्ही या कुटुंबांची मदत करण्यासाठी कट्टीबद्ध आहोत. त्यांना जी मदत लागेल ती आम्ही करू, असं आशीष चौहान यांनी म्हटलं आहे.

दरम्यान पहलगाम हल्ल्यामध्ये ज्यांनी आपल्या घरातील व्यक्ती गमवला आहे, अशा कुटुंबांच्या मदतीसाठी एलआयसी भारतीय जीवन विमा महामंडळानं देखील पुढाकार घेतला आहे. एलआयसीकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. पीडित कुटुबांशी संबंधित आर्थिक मदत देण्यासाठी दाव्यांच्या निपटाऱ्याला प्राधान्य देण्यात येईल असं एलआयसीनं म्हटलं आहे. एलआयसीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, 22 एप्रिल रोजी पहलगामध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला, या हल्ल्यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला. ज्या कुटुंबांवर ही दु:खद वेळ आली त्यांच्या पाठीशी आम्ही उभे आहोत, त्यांना जास्तीत जास्त मदत करूयात असं आवाहन यावेळी एलआयसीच्या वतीनं करण्यात आलं आहे.

  26 जणांचा मृत्यू 

22  एप्रिलला पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला होता, या हल्ल्यामध्ये  26 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एका नेपाळी नागरिकाचा देखील समावेश होता. या हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तावर एअर स्ट्राईक केला.