गल्ली ते दिल्ली… आख्खा देश होरपळणार, महाराष्ट्राच्या या भागासह अनेक राज्यांमध्ये सूर्य आग ओकणार
IMD Weather Update : 24 मे रोजी देशातील काही भागांमध्ये प्रचंड उष्णतेच्या लाटेमुळे नागरिक त्रस्त होणार आहेत, तर काही ठिकाणी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

देशाच्या हवामानात गेल्या काही दिवसांपासून बदल होत आहे. अशातच रविवारी देशातील विविध भागांमध्ये मिश्र हवामान जाणवणार आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 24 मे रोजी देशातील काही भागांमध्ये प्रचंड उष्णतेच्या लाटेमुळे नागरिक त्रस्त होणार आहेत, तर काही ठिकाणी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे दिलासा मिळण्याची शक्यता आहे. पुढील 24 तासांत तापमान आणि पावसाचा असमतोल पॅटर्न अनेक राज्यांमध्ये कायम राहणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या भागातील हवामान लक्षात घेऊन काळजी घ्यावी आणि दुपारच्या वेळेत अनावश्यकपणे बाहेर पडणे टाळावे, असा सल्लाही देण्यात आला आहे. देशाच्या कोणत्या राज्यात हवामान कसे असेल ते जाणून घेऊयात.
उत्तर भारत होरपळणार
उत्तर-पश्चिम भारतातील दिल्ली, हरियाणा, पंजाब, राजस्थान आणि पश्चिम उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये उष्णतेचा सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे. अनेक भागांमध्ये उष्णतेची लाट येऊ शकते आणि तापमान 44 ते 47 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकते. राजस्थानच्या पश्चिम भागात गरम आणि कोरडे वारे वाहणार असल्याने परिस्थिती आणखी कठीण होऊ शकते. राजधानी दिल्ली-एनसीआरमध्येही उकाडा आणि गरम वाऱ्यांमुळे नागरिकांच्या अडचणी वाढू शकतात. विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी अधिक काळजी घ्यावी, असा इशारा IMD ने दिला आहे.
मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये उष्णतेचा तडाखा बसणार
मध्य भारत आणि पश्चिम भारतातील काही भागांमध्येही हवामान गरम आणि कोरडे राहण्याचा अंदाज आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड तसेच महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाडा भागात तापमान सरासरीपेक्षा जास्त राहू शकते. दिवसभर तीव्र उन्हासह गरम वारे वाहणार असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागू शकतो. गुजरातमधील काही भागांमध्येही उष्णतेचा प्रभाव कायम राहणार आहे. काही ठिकाणी आंशिक ढगाळ वातावरण असू शकते, मात्र त्यामुळे तापमानात विशेष घट होण्याची शक्यता कमी आहे.
आसाम-मेघालयात पावसाची शक्यता
पूर्व आणि ईशान्य भारतात हवामानाचा अंदाज थोडा वेगळा आहे. आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालँड आणि मणिपूरमध्ये हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पश्चिम बंगाल, ओडिशा आणि झारखंडच्या काही भागांमध्ये संध्याकाळी ढगाळ वातावरणासह हलक्या सरी पडू शकतात. या पावसामुळे तापमानात काहीसा दिलासा मिळेल, मात्र हवेत आर्द्रता कायम राहू शकते. डोंगराळ भागांमध्ये भूस्खलनासारख्या परिस्थितीबाबत सतर्क राहण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.
केरळ, तामिळनाडूमध्ये ढगाळ वातावरणाची शक्यता
दक्षिण भारतातील केरळ, तामिळनाडू, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये हवामान सामान्य ते आर्द्र राहण्याची शक्यता आहे. किनारपट्टी भागांमध्ये ढगांची वर्दळ आणि हलक्या पावसाचा अंदाज आहे. काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो, ज्यामुळे उष्णतेपासून काही प्रमाणात दिलासा मिळेल. हवामान विभागाने देशभरातील नागरिकांना नियमित हवामान अपडेट्स पाहण्याचा, पुरेसे पाणी पिण्याचा आणि उष्णता तसेच पावसाच्या बदलत्या परिस्थितीत आवश्यक ती खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे.