
मध्यप्रदेशातील शिवपुरी येथील राहणारी सीआरपीएफची असिस्टंड कमांडेंट पूनम गुप्ता नवीन इतिहास रचणार आहे. पूनम तिच्या साधेपणा आणि निष्ठेमुळे ओळखली जाते. सध्या ती राष्ट्रपती भवनात पीएसओ म्हणून कार्यरत आहे. तिच्या कार्यकुशलता आणि व्यवहारावर प्रभावित होऊन राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी तिला राष्ट्रपती भवनात विवाह करण्याची परवानगी दिली आहे. पहिल्यांदाच राष्ट्रपती भवनात विवाह सोहळा पार पडणार आहे. या ऐतिहासिक स्थळात लग्न करणारी पूनम ही पहिली भारतीय व्यक्ती ठरणार आहे.
शिक्षण आणि प्रशासनात यश मिळवलेल्या पूनमने प्रजासत्ताक दिन 2024 ला सीआरपीएफच्या महिला तुकडीचं नेतृत्व केलं होतं. त्यामुळे पूनम चर्चेत आली होती. तिने 2018मध्ये UPSC CAPF परीक्षेत 81वी रँक मिळवली होती. त्यामुळे तिला असिस्टेंट कमांडेंट पदी नियुक्त करण्यात आलं होतं. पूनम ही जवाहर नवोदय विद्यालय, श्योपूरची विद्यार्थीनी आहे. तिने गणितात पदवी आणि इंग्रजी साहित्यात पदव्युत्तर पदवी घेतली आहे. त्यानंतर तिने बीएड सुद्धा केलं होतं.
पूनम गेल्या काही काळापासून राष्ट्रपती भवनातील पर्सनल सेक्युरिटी ऑफिसर पदावर कार्यरत आहे. ती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची सुरक्षा पाहत आहे. तिने यापूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये सेवा दिली आहे. आता तिचं लग्न असिस्टेंट कमांडेंट अविनाश कुमार यांच्यासोबत होणार आहे. येत्या 12 फेब्रुवारी रोजी हा विवाह सोहळा पार पडणार आहे. पूनम अत्यंत मृदू स्वभावाची आहे. तिच्या वाणी माधुर्य आहे. तसेच ती कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणूनही परिचित आहे. तिच्या या गुणांवरच राष्ट्रपती खूश आहेत. जेव्हा पूनम विवाह करतेय याची माहिती राष्ट्रपतींना मिळाली तेव्हा त्यांनी राष्ट्रपती भवनाच्या मदर टेरेसा क्राउन परिसरात तिच्या विवाहाला संमती दिली.
पूनमचे वडील रघुवीर गुप्ता हे शिवपुरी नवोदय विद्यालयाचे ऑफिस सुप्रिटेंडेंट आहेत. आपल्या मुलीच्या या ऐतिहासिक यशाबद्दल त्यांना अभिमान आहे. पूनमच्या लग्नाची तयारी जोरदार सुरू आहे. प्रशासकीय पातळीवर ही तयारी सुरू आहे. राष्ट्रपती भवनात हा विवाह सोहळा होत असल्याने सुरक्षा आणि औपचारिकता लक्षात ठेवून मोजक्याच पाहुण्यांना लग्नाचं आमंत्रण देण्यात आलं आहे.
पूनमचा राष्ट्रपती भवानातील विवाह हे तिचं वैयक्तिक यश नाहीये तर भारतीय इतिहासातही त्याची नोंद होणार आहे. राष्ट्रपती भवनात यापूर्वी कधीही कुणाचा विवाह पार पडला नाही. आता पहिल्यांदाच राष्ट्रपती भवनात एखाद्या नागरिकाचा विवाह होत असून हे अत्यंत गौरवाची बाब आहे.