Rahul Gandhi : सावरकरांनी संविधानापेक्षा मनुस्मृतीला वरचं स्थान दिलं – राहुल गांधी

Rahul Gandhi : "जसा द्रोणाचार्यांनी एकलव्याच अंगठा मागितला, तसं तुम्ही हिंदुस्तानच्या युवकांचा अंगठा कापत आहात. देशातील सर्व उद्योग अदानीला दिले जात आहेत. देशातील उद्योगपतींचा अंगठा कापला जात आहे" असा आरोप राहुल गांधी यांनी केला.

Rahul Gandhi : सावरकरांनी संविधानापेक्षा मनुस्मृतीला वरचं स्थान दिलं - राहुल गांधी
rahul gandhi
| Updated on: Dec 14, 2024 | 2:55 PM

संसदेत संविधानावर चर्चा सुरु आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी बोलत आहेत. संविधानावर चर्चा करताना राहुल गांधी यांनी अभय मुद्रेचा उल्लेख केला. “आपलं संविधान विचारांचा एक समूह आहे. संविधान एक जीवन दर्शन आहे. संविधान आमचा एका सांस्कृतिक विचार आहे. संविधानात प्राचीन वारसा सामावलेला आहे” असं खासदार राहुल गांधी म्हणाले. आरएसएसने मनुस्मृतीला संविधानापेक्षा चांगलं ठरवल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला. “सावरकरांनी सुद्धा संविधानापेक्षा मनुस्मृतीला वरचं स्थान दिलं होतं” असं राहुल गांधी म्हणाले. राहुल गांधी म्हणाले की, ‘संविधानात आम्हाला बाबासाहेबांचे आदर्श दिसतात’

राहुल गांधींनी आपल्या भाषणात द्रोणाचार्य आणि एकलव्यचा उल्लेख केला. “जसा द्रोणाचार्यांनी एकलव्याच अंगठा मागितला, तसं तुम्ही हिंदुस्तानच्या युवकांचा अंगठा कापत आहात. देशातील सर्व उद्योग अदानीला दिले जात आहेत. देशातील उद्योगपतींचा अंगठा कापला जात आहे” असा आरोप राहुल गांधी यांनी केला. “भाजपला देशाची ताकद हिसकावायची आहे. शेतकऱ्यांऐवजी अंबानी, अदानी यांना फायदा पोहोचवला जातोय. पेपरलीक सारख्या प्रकरणात युवकांचा अंगठा जातोय” असं राहुल गांधी म्हणाले.

‘एका धर्माला दुसऱ्या धर्माशी भांडायला लावतात’

“राहुल गांधींनी आपल्या भाषणात हाथरसचा मुद्दा उचलला. आरोपी बाहेर फिरतायत आणि पीडित कुटुंब घरात बंद आहे. पीडित कुटुंबाला मुलीचे अंत्यसंस्कार करु दिले नाहीत” असं राहुल गांधी म्हणाले. “मी हाथरसच्या पीडित कुटुंबाला भेटलो आहे. सीएम हाथरस घटनेबद्दल खोटं बोलले. आरोपी पीडित परिवाराला धमकावतात. कारण यूपीमध्ये संविधान नाही, मनुस्मृती लागू आहे” असं राहुल गांधी म्हणाले. “भाजपवाले संविधानावर हल्ला करतात. त्यांनी संभलचा मुद्दा सुद्धा उचलला. संभलमध्ये पाच जणांची हत्या करण्यात आली” असं राहुल गांधी म्हणाले. “भाजपचे लोक एका धर्माला दुसऱ्या धर्माशी भांडायला लावतात हे कुठे संविधानात लिहिलं आहे? आमची आणि इंडिया आघाडीची देशात संविधान स्थापन करण्याची विचारधारा आहे” असं राहुल गांधी म्हणाले.