पाकिस्तानी न्यूज चॅनल्सवर भारतात बंदी; शोएब अख्तर-आरजू काझमी यांचे युट्यूब चॅनल्ससुद्धा बंद

भारताविरुद्ध सतत प्रक्षोभक, सांप्रदायिकदृष्ट्या संवेदनशील कंटेट आणि चुकीची माहिती पसरवल्यामुळे अनेक पाकिस्तानी युट्यूब चॅनल्स भारतात ब्लॉक करण्यात आल्याची माहिती गृह मंत्रालयाशी संबंधित एका अधिकाऱ्याने दिली आहे.

पाकिस्तानी न्यूज चॅनल्सवर भारतात बंदी; शोएब अख्तर-आरजू काझमी यांचे युट्यूब चॅनल्ससुद्धा बंद
Shoaib Akhtar
Image Credit source: Instagram
| Updated on: Apr 28, 2025 | 11:28 AM

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून पाकिस्तानविरोधात सतत कठोर निर्णय घेतले जात आहेत. आता भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या शिफारशींनंतर पाकिस्तानच्या अनेक युट्यूब चॅनल्सवर बंदी आणण्यात आली आहे. या चॅनल्समध्ये माजी क्रिकेटर शोएब अख्तर आणि आरजू काझमी यांसारख्या मोठमोठ्या युट्यूब चॅनल्सचाही समावेश आहे. त्याचसोबत प्रमुख मीडिया हाऊसच्या युट्यूब चॅनल्सवरही भारतात बंदी घातली आहे. दहशतवाद्यांना उग्रवादी म्हटल्याने बीबीसीला पत्र पाठवलं गेलंय. गृह मंत्रालयाच्या शिफारशींनुसार, भारत सरकारने गेल्या आठवड्यात 22 एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी घटनेनंतर अनेक पाकिस्तानी युट्यूब चॅनल्सवर बंदी घातली आहे. भारत, भारताचं लष्कर आणि सुरक्षा एजन्सींविरुद्ध प्रक्षोभक आणि सांप्रदायिकदृष्ट्या संवेदनशील कंटेट, खोट्या गोष्टी आणि चुकीची माहिती पसरवल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली आहे.

पाकिस्तानातील ज्या 16 युट्यूब चॅनल्सवर बंदी घालण्यात आली आहे, त्यात शोएब अख्तरचं चॅनल तसंच तिथल्या अनेक प्रमुख मीडिया हाऊसेसचे युट्यूब चॅनल्स यांचा समावेश आहे. डॉन न्यूज, समा टीव्ही, एआरवाय न्यूज, बोल न्यूज, रफ्तार टीव्ही, द पाकिस्तान रेफरन्स, जिओ न्यूज, समा स्पोर्ट्स आणि उजैर क्रिकेट हे त्यात प्रमुख आहेत.

भारत सरकारने बंदी घातलेल्या 16 पाकिस्तानी युट्यूब चॅनल्सचे एकूण 63.08 दशलक्ष म्हणजेच 6.3 कोटींहून अधिक सबस्क्राइबर्स आहेत. त्यापैकी जिओ न्यूजच्या युट्यूब चॅनलचे सर्वाधिक 18.9 दशलक्ष म्हणजेच 1.8 कोटी सबस्क्राइबर्स आहेत. त्याचप्रमाणे एआरवाय न्यूजचे सुमारे 14.6 दशलक्ष म्हणजेच 1.4 कोटींहून अधिक सबस्क्राइबर्स आहेत. यानंतर समा न्यूजचे सुमारे 12.7 दशलक्ष म्हणजेच 1.2 कोटींहून अधिक सबस्क्राइबर्स आहेत.

दरम्यान पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांना उग्रवादी म्हटल्याने भारत सरकारने बीबीसीला पत्र लिहिलं आहे. सरकारने बीबीसीच्या दहशतवाद्यंना उग्रवादी म्हटल्याच्या त्यांच्या रिपोर्टवर औपचारिक पत्र पाठवून उत्तर मागितलं आहे.

22 एप्रिल रोजी पहलगाममधील बैसरन याठिकाणी दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात 26 पर्यटक मारले गेले. एप्रिल आणि मे महिन्यात काश्मीरमध्ये असंख्य पर्यटक फिरायला जातात. याच गोष्टीचा फायदा घेत दहशतवाद्यांनी पर्यटकांना लक्ष्य केलं. या घटनेवरून देशभरात संतापाची लाट उसळली आहे.