
ऑपरेशन सिंदूर दरम्यान उपग्रह तंत्रज्ञानाचा झालेला फायदा सर्वांना माहीत आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये इलेक्ट्रॉनिक वॉरफेयर, सिग्नल जॅमिंग आणि रडार तंत्रज्ञानाची काय भूमिका राहिली? ते सर्व जगाने पाहिले. त्यावेळी भारताने 22 मिनिटे पाकिस्तानच्या संरक्षण संस्थांची सिग्नल प्रणाली जाम केली होती. या 22 मिनिटांत भारताने पाकिस्तानवर हल्ला करुन दहशतवादी तळ नष्ट केली. इलेक्ट्रॉनिक वॉरफेयरचे हे युद्ध अंतराळात फिरणाऱ्या भारतीय उपग्रहांमुळे शक्य झाले.
ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तान, पाकिस्तान व्याप्त काश्मीर, जैश-ए-मोहम्मद, लश्कर-ए-तैयबा आणि हिज्बुल मुजाहिदीन यांच्या ठिकाणांची अचूक माहिती भारताला मिळाली. त्या इंटेलिजेन्स इनपूटच्या मदतीने भारताने पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील बहावलपूर, मुजफ्फराबाद, कोटली आणि सियालकोट येथील दहशतवादी तळांवर हल्ला केला. भारत उपग्रहाचे हे तंत्रज्ञान अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे.
ऑपरेशन सिंदूरनंतर भारताने शत्रू क्षेत्रांवरील देखरेख वाढवण्यासाठी ५२ उपग्रहांचे प्रक्षेपण करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. यामुळे भारताला दक्षिण आशियासह संपूर्ण जगातील प्रतिमा उपग्रहच्या माध्यमातून मिळू शकतील. गरज पडल्यास या उपग्रहांचा वापर भारत लष्करी उद्देशांसाठी करणार आहे. भारताने अंतराळातून देखरेख ठेवण्यासाठी मागील वर्षी २६ हजार ९६८ कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात केली होती. या उपग्रहांचे नेटवर्क या प्रकल्पाचा भाग आहे. या योजनेत इस्त्रोचे २१ उपग्रह आणि तीन खासगी कंपन्यांचे ३१ उपग्रहांचा समावेश आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिला उपग्रह २०२६ मध्ये प्रेक्षपित करण्यात येणार आहे. या योजनेतील शेवटच्या उपग्रहाचे लॉचिंग २०२९ मध्ये होणार आहे. संरक्षण मंत्रालयाकडून या योजनेवर लक्ष ठेवले जात आहे. या उपग्रहांच्या नेटवर्कमुळे चीन, पाकिस्तान आणि हिंद महासागरातील देखरेख अधिक प्रभावी होणार आहे. शत्रूंच्या प्रत्येक हालचालींची माहिती या उपग्रहांच्या माध्यमातून मिळणार आहे.
उपग्रहांचा वापर प्रामुख्याने लष्करी, गुप्तचर, पर्यावरणीय आणि व्यावसायिक कारणांसाठी करण्यात येतो. उपग्रहांमध्ये उच्च-रिझोल्यूशन कॅमेरे, रडार, इन्फ्रारेड सेन्सर आणि इतर उपकरणे असतात. त्यामुळे रिअल-टाइममध्ये किंवा नियमित अंतराने प्रतिमा, व्हिडिओ आणि इतर डेटा मिळतो.