भारताची खतरनाक प्लॅनिंग; 35 मिनिटांत पाकिस्तानचा खेळ खल्लास

पाकिस्तानकडून केल्या जाणाऱ्या प्रत्येक हल्ल्याला जशास तसं प्रत्युत्तर दिलं जाईल, असा इशारा भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी दिला. तणाव कमी करण्याची जबाबदारी आता पाकिस्तानची आहे, असंही त्यांनी ठणकावून सांगितलं.

भारताची खतरनाक प्लॅनिंग; 35 मिनिटांत पाकिस्तानचा खेळ खल्लास
तिन्ही सैन्य दलांच्या प्रमुखांसोबत राजनाथ सिंह
Image Credit source: Tv9
| Updated on: May 09, 2025 | 9:26 AM

पाकिस्तानकडून सलग दोन रात्री क्षेपणास्त्रांचा मारा करण्यात येत असल्याने जम्मू, पंजाब, राजस्थान, गुजरात या राज्यांतील अनेक शहरांत गुरुवारी रात्री ‘ब्लॅकआऊट’ करण्यात आला. भारताने नऊ दहशतवादी तळांवर केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची भंबेरी उडाली आहे. या कारवाईला प्रत्युत्तर देण्यासाठी बुधवारी मध्यरात्रीनंतर पाकिस्तानने अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, कुपवाडा, जालंधर, लुधियाना, अदमपूर, भटिंडा, चंदीगड, नाल, फलोदी, भुज या भारतीय ठिकाणांना लक्ष्य केलं. इथल्या लष्करी आस्थापनांवर पाकिस्तानने क्षेपणास्त्रे आणि आत्मघातकी ड्रोनचे हल्ले केले. मात्र भारताच्या ‘इंटिग्रेटेड काऊंटर अनमॅन्ड एअरक्राफ्ट’ प्रणालीने ते हवेतच टिपले. भारतानेही इस्लामाबाद, कराची, लाहोर यांसह अनेक शहरांमध्ये दारुगोळ्यांचा पाऊस पाडला. भारताची प्लॅनिंग पाहून पाकिस्तान घाबरला आणि अवघ्या 35 मिनिटांतच त्यांचा खेळ खल्लास झाला.

भारताने पाकिस्तानच्या आठ शहरांवर क्षेपणास्त्रे डागली आहेत. यामध्ये लाहोर, इस्लामाबाद, कराची, सियालकोट, बहावलपूर, पेशावर यांचा समावेश आहे. याशिवाय पीओकेमधील मुझफ्फराबाद आणि कोटली इथंही भारताने निशाणा साधला आहे. भारताने लाहोरमध्ये पाकिस्तानची हवाई संरक्षण प्रणाली नष्ट केली. तिन्ही सैन्य दलाने पाकिस्तानविरुद्ध एकाच वेळी आघात केला.

भारतीय नौदलाने पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद आणि कराची बंदरावर 10 क्षेपणास्त्रे आणि ड्रोन डागले. भारताने समुद्री हल्ल्यात पाकिस्तानचं कराची बंदर उद्ध्वस्त केल्याची माहिती समोर येत आहे. अरबी समुद्रात तैनात असलेल्या INS विक्रांतमुळे हे शक्य झालं. नौदलाच्या या जबरदस्त हल्ल्यामुळे कराची बंदरासह शहरातील अनेक भागात नुकसान झालं आहे.

दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील पूंछ आणि राजौरी सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून जोरदार गोळीबार करण्यात आला आहे. भारतीय सैन्याकडूनही त्याला योग्य उत्तर दिलं जात आहे. लोकांना सीमेवरील बंकरमध्ये हलवण्यात आलं आहे. तर दिल्ली, गुजरात हाय अलर्टवर आहेत. याशिवाय उत्तर प्रदेश आणि हिमाचलमध्येही सुरक्षा वाढवण्यात आली आहे. जैसलमेर, अमृतसर, जम्मूसह 24 विमानतळ बंद करण्यात आले आहेत. प्रवाशांसाठी सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

भारताने पाकिस्तानचा हल्ल्याचा प्रयत्न कुठे-कुठे हाणून पाडला?

  • श्रीनगर – जम्मू आणि काश्मीर
  • जम्मू – जम्मू आणि काश्मीर
  • अवंतीपोरा – जम्मू आणि काश्मीर
  • उधमपूर – जम्मू आणि काश्मीर
  • पठाणकोट – पंजाब
  • अमृतसर – पंजाब
  • कपूरथळा – पंजाब
  • जालंधर – पंजाब
  • लुधियाना – पंजाब
  • भटिंडा – पंजाब
  • आदमपूर – पंजाब
  • जैसलमेर – राजस्थान
  • फलोदी – राजस्थान
  • उत्तरलाई – राजस्थान
  • भुज – गुजरात
Follow Us