हा मूर्खपणा कधी थांबणार? ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर स्वरा भास्करच्या पोस्टवर भडकले नेटकरी
अभिनेत्री स्वरा भास्कर तिच्या बेधडक वक्तव्यांसाठी ओळखली जाते. परंतु यामुळे अनेकदा तिला टीकेचा सामना करावा लागतो. ऑपरेशन सिंदूरनंतर स्वराने काही पोस्ट शेअर केले आहेत, त्यावरून नेटकरी तिच्यावर चांगलेच भडकले आहेत.

‘ऑपरेशन सिंदूर’मुळे गोंधळून गेलेल्या पाकिस्तानने बुधवारी आणि गुरुवारी रात्री जम्मू, पंजाब, राजस्थान, गुजरातमधील सीमेलगतच्या भागांतील भारतीय लष्कराच्या आस्थापनांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारताच्या मजबूत हवाई यंत्रणांनी तो पूर्णपणे हाणून पाडला. उलट प्रत्युत्तरात भारताने केलेल्या कारवाईत लाहोरमधील हवाई सुरक्षा यंत्रणा नष्ट झाल्याचं वृत्त समजतंय. त्याचप्रमाणे पाकिस्तानची दोन लढाऊ विमानंही उद्ध्वस्त झाल्याचं कळतंय. पाकिस्तानच्या क्षेपणास्त्रांचा मारा रात्री उशिरापर्यंत सुरू होता आणि भारताकडून तितक्याच तत्परतेने परतावून लावला जात होता. अशा युद्धजन्य परिस्थितीत अभिनेत्री स्वरा भास्करचे सोशल मीडियावर पोस्ट चर्चेत आले आहेत. स्वराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही पोस्ट शेअर केले आहेत. त्यातील एका पोस्टमध्ये तिने युद्धाला ‘प्रोपगेंडा’ (प्रचारकी) म्हटलंय.
स्वराने जॉर्ज ऑरवेल यांची ओळख शेअर केली आहे. त्यात लिहिलंय, ‘प्रत्येक युद्ध प्रोपगेंडा आहे. सर्व ओरडा, आवाज, असत्य आणि द्वेष नेहमी त्या लोकांकडून येतं, जे लढत नाहीत.’ स्वराने आणखी एका युजरची पोस्ट शेअर केली आहे. त्यात म्हटलंय, ‘ज्यांना युद्ध हवंय त्या सर्व लोकांना निवेदन आहे की त्यांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांकडे एकदा पहा आणि निश्चित करा की तुम्ही कोणाला गमावण्यासाठी तयार आहात? कारण आपण जर युद्धात उतरलो तर ते फक्त सीमेवरच नाही तर खरंच आपल्या घराबाहेरही लढलं जाईल.’




स्वराने यासोबतच हैदराबादच्या कराची बेकरीवर तिरंगा फडकावल्याची बातमी शेअर करत लिहिलं, ‘या मूर्खपणाचा शेवट कधी होणार? आपण हिंदू सिंधींना त्यांच्या मूळांसाठी शिक्षा देतोय. तुम्ही अशा कोणत्याही गोष्टीची कल्पना करू शकता का, जी एकाच वेळी नीच आणि मूर्खपणाची असेल?’ स्वराचे हे पोस्ट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी तिला ट्रोलसुद्धा केलंय.
दरम्यान पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर केलेले हल्ले हे पहगाममधील हल्ल्याचं प्रत्युत्तर होतं. त्यामुळे आता पाकिस्तानकडून केल्या जाणाऱ्या प्रत्येक हल्ल्याला ‘जशास तसं’ प्रत्युत्तर दिलं जाईल, असा इशारा भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी दिला. तणाव कमी करण्याची जबाबदारी आता पाकिस्तानची आहे, असंही त्यांनी ठणकावून सांगितलं.