
सध्या मध्य पूर्वेतील इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. या वाढत्या तणावामुळे जागतिक बाजारपेठेत मोठी खळबळ उडाली आहे. जगातील खनिज तेल आणि गॅस वाहतुकीचा मुख्य मार्ग असलेली होर्मुझची सामुद्रधुनी (Strait of Hormuz) युद्धजन्य परिस्थितीमुळे बंद झाल्याने भारताच्या एलपीजी (LPG) आणि नैसर्गिक वायू (Natural Gas) पुरवठ्यावर विपरित परिणाम झाला आहे. या आणीबाणीच्या परिस्थितीत केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने एलपीजी आणि नॅचरल गॅसच्या वाटपासाठी स्पष्ट प्राधान्यक्रम जारी केले आहेत.
केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, ज्या क्षेत्रांचा थेट संबंध सामान्य माणसाच्या दैनंदिन गरजांशी आहे, तिथे कोणत्याही प्रकारची कपात केली जाणार नाही. यात घरगुती पीएनजी, सार्वजनिक वाहतूक, एलपीजी सिलेंडर, पाईपलाईन ऑपरेशन याचा समावेश आहे. या आणीबाणीच्या स्थितीत कोणाला किती गॅस मिळणार, याचे स्पष्ट आदेश केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने दिले आहेत.
सामान्य माणसाच्या जगण्याशी संबंधित क्षेत्रांना केंद्र सरकारने ‘नो कट’ झोनमध्ये ठेवले आहे
घरगुती पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी उद्योगांच्या गॅस वापरावर सरकारने कात्री लावली आहे.
गॅसचा साठा दीर्घकाळ टिकवण्यासाठी सरकारने बुकिंगच्या कालावधीत बदल केला आहे. आता ग्राहकांना एकदा सिलेंडर घेतल्यावर पुढील २५ दिवसांपर्यंत दुसरे रिफिल बुकिंग करता येणार नाही. यापूर्वी हा कालावधी २१ दिवसांचा होता. अनावश्यक साठेबाजी रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
परिस्थिती गंभीर असली तरी भारताकडे सध्या ४० दिवस पुरेल इतका एलपीजीचा बफर स्टॉक उपलब्ध आहे. तसेच, भारत आता केवळ मध्य पूर्वेवर अवलंबून न राहता अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाकडून अधिक आयात करण्याच्या तयारीत आहे. पण तरीही पुढील काही दिवस नागरिकांनी गॅसचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन मंत्रालयाकडून करण्यात आले आहे.