आम्हाला शांतता हवी, पण कोणी डिवचले तर सोडणार नाही; संरक्षणमंत्र्यांचा चीनला इशारा

| Updated on: Dec 30, 2020 | 9:05 AM

कोणताही विस्तारवादी देश आपली भूमी बळकावण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला रोखण्याचे सामर्थ्य आणि धमक भारतामध्ये आहे. | Rajnath Singh

आम्हाला शांतता हवी, पण कोणी डिवचले तर सोडणार नाही; संरक्षणमंत्र्यांचा चीनला इशारा
राजनाथ सिंह
Follow us on

नवी दिल्ली: भारताचा स्वाभिमान दुखावणारी कोणतीही गोष्ट कदापि खपवून घेतली जाणार नाही. आम्हाला शांतता हवी आहे. पण कोणीही डिवचले तर आम्ही त्यांना सोडणार नाही, अशा शब्दांत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी चीनला (China) इशारा दिला आहे. (Defence Minister Rajnath Singh warns China over border dispute)

ते ‘एएनआय’ वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. यावेळी राजनाथ सिंह यांना आगामी वर्षात सीमारेषेवर चीनशी संघर्ष झाल्यास भारताची भूमिका काय असेल, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर राजनाथ सिंह यांनी भारत चीनच्या प्रत्येक हल्याला जशास तसे उत्तर देईल, असे स्पष्ट केले. कोणताही विस्तारवादी देश आपली भूमी बळकावण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला रोखण्याचे सामर्थ्य आणि धमक भारतामध्ये आहे. मग तो जगातील कोणताही देश असो, असे राजनाथ सिंह यांनी म्हटले.

दरम्यान, भारत आणि चीन यांच्यात लडाखमध्ये सुरु असलेल्या चर्चेला अद्याप यश न आल्याचेही राजनाथ सिंह यांनी सांगितले. लष्करी चर्चेची पुढची फेरी कधीही पार पडू शकते. मात्र, समाधानकारक तोडगा न निघाल्यास सीमेवरील परिस्थिती तशीच राहील. हे चांगले लक्षण नाही. सीमारेषेवर तणाव राहिल्यास दोन्ही बाजुंकडून मोठ्याप्रमाणावर तैनात करण्यात आलेले सैन्य मागे घेतले जाणार नाही. त्यामुळे आगामी चर्चेचे फलित हे सकारात्मक असावे, अशी आमची अपेक्षा असल्याचे राजनाथ सिंह यांनी म्हटले.

‘मोदी सरकारने सुरक्षादलांना सर्वाधिक सुविधा पुरवल्या’

मोदी सरकारच्या काळात भारतीय सुरक्षादलांना सर्वाधिक सुविधा पुरवण्यात आल्याचा दावा राजनाथ सिंह यांनी मुलाखतीत केला. मला पूर्वीच्या सरकारच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करायचे नाही. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेची सूत्र हाती घेतल्यापासून देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे. त्यासाठी सुरक्षादलांना जास्तीत जास्त सुविधा पुरवल्या जात असल्याचे राजनाथ सिंह यांनी म्हटले.

सीमाभागात चीनकडून मोठ्याप्रमाणावर बांधकाम

चीनकडून सीमाभागात मोठ्याप्रमाणावर पायाभूत सुविधांची उभारणी केली जात असल्याची माहिती राजनाथ सिंह यांनी दिली. भारतही आपल्या सैनिकांसाठी सीमाभागात वेगाने पायाभूत सुविधा उभारत आहे. मात्र, याचा उद्देश कोणावरही आक्रमण करणे नसून आपल्या लोकांच्या सोयीसाठी भारताकडून पायाभूत बांधकाम केले जात असल्याचे राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले.

संबंधित बातम्या:

चीन ‘सुपर सोल्जर्स’ची तुकडी उभारणार? सैनिकांची शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी बायोलॉजिकल टेस्ट

Indian Special Force | पाकिस्ताननंतर टार्गेट चीन, ‘सर्जिकल स्ट्राईक’ची स्पेशल फोर्स पुन्हा रणांगणात

(Defence Minister Rajnath Singh warns China over border dispute)