Nepal Floods : मोठी बातमी! नेपाळच्या महापुरात इन्फोसिसचे बडे अधिकारी बेपत्ता; शोध सुरू
याच महापुराबाबत एक धक्कादायक अशी माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार इन्फोसीसचे पब्लिक सर्व्हिसेसचे सीईओ या महापुरानंतर गायब झाले आहेत. त्यांचा पत्ता मिळत नाहीये.

Nepal Floods Infosys CEO : नेपाळमध्ये आलेल्या महापुरामुळे 600 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. अद्याप शेकडो लोक गायब आहेत. या महापुराचे अनेक धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अचानक आलेल्या या महापुराने नेपाळ आणि तिबेटच्या सीमावर्ती भागात जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. याच महाप्रलयामध्ये भारतातील, महाराष्ट्रातील काही पर्यटकही अडकले आहेत. केंद्र आणि राज्य सरकार या लोकांना आपल्या मायदेशी आणण्यासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न करत आहे. दरम्यान, याच महापुराबाबत एक धक्कादायक अशी माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार इन्फोसीसचे पब्लिक सर्व्हिसेसचे सीईओ गोपीशेट्टी या महापुरानंतर गायब झाले आहेत. त्यांचा पत्ता मिळत नाहीये.
इन्फोसिसने नेमकी काय माहिती दिली?
इन्फोसिसने शुक्रवारी गोपीशेट्टी हे गायब असल्याची माहिती दिली. गोपीशेट्टी हे इन्फोसिसची उपकंपनी असलेल्या इन्फोसिस पब्लिक सर्व्हिसेसचे प्रमुख आहेत. ही कंपनी अमेरिका आणि कॅनडामध्ये पब्लिक सर्व्हिसेस या क्षेत्रात काम करते. वैयक्तिक कारणासाठी ते नेपाळमध्ये गेले होते, असे कंपनीने सांगितले आहे. त्यांची सुरक्षितता आणि प्रकृतीची काळजी हे कंपनीचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचेही कंपनीने स्पष्ट केले.
कंपीनतर्फे दिली जातेय पूर्ण मदत
गोपीशेट्टी हे गायब झाल्यानंतर त्यांचा शोध घेतला जातोय. अद्याप त्यांच्याबद्दल नेमकी माहिती मिळू शकलेली नाही. परंतु इन्फोसिस पब्लिक सर्व्हिसेस या कंपनीकडून त्यांचा शोध घेण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले जात आहेत. या काळात कंपनी गोपीशेट्टी यांच्या कुटुंबीयांना हवी ती सर्व मदत पुरवत आहे.
नेपाळमधील विध्वंसात किती नुकसान
दरम्यान, सध्या हाती आलेल्या माहितीनुसार नेपाळमधील महापुरामुळे मृतांची संख्या ही 626 वर पोहोचली आहे. तर 320 भारतीय अजूनही बेपत्ता आहेत. या बेपत्ता भारतीयांचा शोध घेतला जात आहे. भारतातून यात्रेसाठी गेलेले साधारण 400 भाविक हे तिबेटच्या सीमेवर अडकले आहेत. त्यांनाही सुखरुप भारतात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. दुसरीकडे आज दुपारी नेपाळहून 21 भारतीय दिल्लीच्या विमानतळावर उतरले आहेत. लवकरच तिथे अडकलेल्या सर्व भारतीयांना मायदेशी आणले जाणार आहे.