काश्मिरात शिया मुसलमानही चिंतेत, ISIS च्या नावाने त्यांनाही धमक्या, एकाने लिहिले- हिंदूशिवाय आपलं भविष्य नाही

| Updated on: Jun 04, 2022 | 12:54 PM

शुक्रवारच्या जुम्म्याच्या नमाजानंतर काश्मिरात अनेक ठिकाणी मौलवींनी अल्पसंख्याक समाजाच्या होत असलेल्या हत्यांची निंदा करत, त्याविरोधात आवाज उठवला आहे. काश्मिरात अशा हत्या नागरिकांना नको आहेत, असे मौलवींनी ठासून सांगितले आहे.

काश्मिरात शिया मुसलमानही चिंतेत, ISIS च्या नावाने त्यांनाही धमक्या, एकाने लिहिले- हिंदूशिवाय आपलं भविष्य नाही
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

श्रीनगर : जम्मू काश्मीर सुरु असलेल्या टार्गेट किंलिंग (Target killing) आणि दहशतवादी (Terrorist) कारवायांना मोठ्या प्रमाणावर पहिल्यांदाच विरोध होतो आहे. या घटनांविरोधात मोठ्या प्रमाणावर निदर्शने आणि आंदोलने होत आहेत. काश्मिरी पंडित (Kashmiri Pandit), गैर काश्मिरी, परप्रांतीय, लहान शाळकरी मुले हे सगळेच या आंदोलनात सहभागी होताना दिसत आहेत. काश्मिरी पंडित काश्मीर खोरे सोडून सुरक्षित स्थळी जाण्याच्या प्रयत्नात आहेत, पण तेही यावेळी जाहीरपणे या घटनांचा निषेध करण्यासाठी सरसावले आहेत. शुक्रवारी ६०० हून अधिक कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली आहेत. गेल्या २२ दिवसांत ८ टार्गेट किलिंगच्या घटना काश्मीर खोऱ्यांत घडल्या आहेत. यातून काश्मिरी पंडित आणि परप्रांतियांच्या मनात भीती निर्माण करण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न आहे.

शिया मुसलमानांसाठीचे काय ट्विट?

खोऱ्यात सुरु असलेल्या निदर्शनांच्या फोटोसह, राजकारणी आणि लेखक जावेद बेग यांनी केलेले ट्विट सध्या चर्चेत आहे. त्यात जावेद बेग यांनी लिहिले आहे की – काश्मिरातील माझ्या १५ लाख शिया मुस्लीम बंधू आणि भगिनींनो, श्रीनगरमध्ये ISIS कडून शिया मुस्लिमांच्या घरांबाहेर शिया काफिर अशा घोषणा मोठ्या अक्षरात लिहिण्यात आल्या आहेत, ही तीन आठवड्यांपूर्वीची घटना आहे, हे लक्षात ठेवा. हिंदूच्या शिवाय आपले नशीब गेल्यावेळेपेक्षाही अधिक खराब असेल. बाहेर या आणि आत्ताच विरोध करा.

ISIS शियांच्या विरोधात

ISIS संघटना ही शिया मुसलमानांच्या विरोधात आहे. खोऱ्यात शिया हे अल्पसंख्य आहेत. आता या घडलेल्या घटनेत किती सत्य आहे, हा तपासाचा भाग आहे.

हे सुद्धा वाचा

१९९० सारखी स्थिती होणार नाही

होणाऱ्या टार्गेट किलिंगमुळे जरी काश्मिरी पंडित आणि परप्रांतीय खोरे सोडत असले तरी पहिल्यांदाच दहशतवादाचा विरोध रस्त्यावर उतरुन करण्यात येो आहे. यातच केंद्रीय गृहमंत्रालयाने उच्चसत्रीय बैठक घेत हा संदेश दिला आहे की, १९९० सारखी परिस्थिती यावेळी उद्भवू देणार नाही. जम्मू काश्मीर परिसरात ४०० निमलष्करी दलाच्या अधिकच्या तुकड्या तैनात होतील अशी सूत्रांची माहिती आहे. हिंदू अधिकाऱ्यांचे पोस्टिंग सुरक्षित ठिकाणी करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल हे या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

मौलवींनीही दहशतवादाविरोधात उठवला आवाज

शुक्रवारच्या जुम्म्याच्या नमाजानंतर काश्मिरात अनेक ठिकाणी मौलवींनी अल्पसंख्याक समाजाच्या होत असलेल्या हत्यांची निंदा करत, त्याविरोधात आवाज उठवला आहे. काश्मिरात अशा हत्या नागरिकांना नको आहेत, असे मौलवींनी ठासून सांगितले आहे. इस्लाम अशा हत्यांना परवानगी देत नसल्याचे या मौलवींचे म्हणणे आहे. वैयक्तिक स्वार्थासाठी काश्मिरातील धर्मनिरपेक्ष वातावरण खराब करणाऱ्यांचे समर्थन करणार नाही असे त्यांनी सांगितले आहे.

शाळकरी मुलांचाही विरोध

गैर काश्मिरींवर होत असलेल्या हल्ल्यांना शाळांतूनही विरोध होतो आहे. शाळांच्या प्रार्थनेच्यावेळी विरोधाची घोषणाबाजी होते आहे. शाळेतील मुले आणि कर्मचारी या घोषणा देतायेत. सोशल मीडियावर याचे व्हिडिओही आले आहेत. शिक्षक संघटनेकडून या हत्यांचा जाहीर निषेध करण्यात आला आहे. निर्दोषांची हत्या बंद करा, असे पोस्टर्स काही शाळांत विद्यार्थी घेऊन उभे असल्याचेही दिसते आहे.

देशात ४४ हजार काश्मिरी पंडितांची कुटुंबे विस्थापित

एका अहवालानुसार खोऱ्यातून निघून गेलेली ४३ हजार ६१८ काश्मिरी पंडितांची कुटुंबे आत्ता जम्मूत आश्रयाला आहेत. दिल्लीत १९,३३८ तर देशाच्या इतर भागात १९९५ पासून काहीजण स्थायिक आहेत.