असा शिक्षणमंत्री देशाने पाहिला नाही, तो पहाटे 4 वाजताच पोरांच्या घरी जायचा, उठवायचा, अभ्यासाची प्रेरणा द्यायचा…

| Updated on: Apr 06, 2023 | 2:55 PM

देशाचं भविष्य घडवायचं असेल तर विद्यार्थी घडले पाहिजेत, हे तत्त्व आयुष्यभर जपणारा अवलिया जगरनाथ महतो यांचं आज पहाटेच निधन झालं.

असा शिक्षणमंत्री देशाने पाहिला नाही, तो पहाटे 4 वाजताच पोरांच्या घरी जायचा, उठवायचा, अभ्यासाची प्रेरणा द्यायचा...
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

रांची (झारखंड) : काही कारणानं त्यांचं शिक्षण (Education) थांबलं. पुढे राजकारणात सक्रिय झाले. मेहनत, जिद्दीने लोकप्रिय झाले. आमदार झाले. मंत्री बनले. शिक्षण खातं मिळालं तेव्हा तर झपाट्याने कामाला लागले. आपल्या परिसरातील पोरं शिकली पाहिजेत. अभ्यासाचं महत्त्व त्यांना कळलं पाहिजे, ही त्याची तळमळ. मी शिकलो नाही, पण तुम्ही शिका. पहाटे, ब्रह्ममुहूर्ताची वेळ साधा, असं पोट तिडिकीने सांगायचा. हा अवलिया होता जगरनाथ महतो (Jagarnath mahto). झारखंडचे (Jharkhand) शिक्षणमंत्री. आज 06एप्रिल रोजी पहाटेच त्यांचं निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. अखेर आज त्यांनी जगाचा निरोप घेतला. मोहतोंच्या निधनानंतर त्यांची विद्यार्थ्यांसाठीची तळमळ आणि समाजकार्य पुन्हा एकदा चर्चेत आलंय.

पहाटेच दहावीच्या पोरांना उठवायचे

राजकारणात आल्याने जगरनाथ मोहतो हे दहावीपर्यंतच शिकले. पण माझ्यासारखं तुम्ही करू नका, हे पोरांना ते तळमळीनं सांगायचे. स्वतःच्या मतदार संघात फिरायचे. दहवीच्या विद्यार्थ्यांची माहिती घ्यायचे. जेव्हा जेव्हा दहावीची परीक्षा असेल तेव्हा पहाटे चारच्या आधीच स्वतः तयार व्हायचे. घरोघरी जाऊन विद्यार्थ्यांना उठवायचे.

विद्यार्थ्यांना काय सांगायचे?

जगरनाथ मोहतो विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी नेहमी प्रेरणा देत असत. सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठावं. या वेळी अभ्यास चांगला होतो. मग रिझल्टही चांगला येईल. आई-बाबांना आनंद होईल. तुमचं भलं होईल. समाजाचं अन् देशाचंही भलं होईल, असा संदेश ते मुलांना देत असत.

शिकवायची प्रचंड आवड…

जगरनाथ मोहतो केवळ दहावीच्या विद्यार्थ्यांना पहाटे जाऊन उठवत नसत तर जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा मुलांना शिकवत असत. २०२० मध्ये शिकवतानाच त्यांना कोरोना संसर्ग झाला. त्यानंतर त्यांची तब्येत वारंवार बिघडत होती. पण झारखंडचा टायगर या नावाने ओळखल्या जाणाऱ्या जगरनाथ महतो यांनी हार मानली नाही.

चेन्नईत दीर्घ उपचार

कोरोनाच्या लाटेदरम्यान, जगरनाथ मोहतो यांना संसर्ग झाला. अनेक दिवस उपचार चालले. झारखंडमधील अनेक रुग्णालयात ट्रिटमेंट झाली. अखेर चेन्नईतील एका मशीनद्वारे उपचार झाले. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या पुढाकारातून त्यांना चेन्नईच्या रुग्णालयात भरती करण्यात आलं. तिथे एमजीएम रुग्णालयात त्यांच्या फुप्फुसांचं प्रत्यारोपण करण्यात आलं. अनेक दिवस उपचारानंतर ते झारखंडला परतले होते. अखेर आज त्यांच्या निधनाचं वृत्त आलं. झारखंडचा टायगर अशी ख्याती असलेल्या जगरनाथ महतो यांच्या निधनाने राजकीय वर्तुळातून हळहळ व्यक्त होत आहे.