अखेर सरकार झुकलं! झारखंडमध्ये विद्यार्थी आंदोलनाला यश, मुख्यमंत्री सोरेन यांची मोठी घोषणा
Jharkhand Student Protest : झारखंडमधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश आले आहे. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी सोमवारी JSSC-CGL परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

झारखंडमध्ये भरती परीक्षांबाबत सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अखेर यश आले आहे. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी सोमवारी JSSC-CGL परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, TDPL शी संबंधित सर्व गोष्टी रद्द करण्यात येणार आहेत. यामध्ये TDPL कडून घेण्यात आलेल्या परीक्षा, जाहीर करण्यात आलेले निकाल, निवड झालेले उमेदवार आणि त्यासंबंधीच्या इतर सर्व प्रक्रियांचाही समावेश आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
मुख्यमंत्री सोरेन काय म्हणाले?
परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेताना मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की,’आज हा विषय संपवण्यासाठी आम्ही मंत्रिमंडळाची विशेष बैठक घेतली. यामध्ये सर्व बाबींवर तोडगा काढत आम्ही निर्णय घेतला आहे की, TDPL कडून घेण्यात आलेल्या परीक्षा, त्यांच्याकडून जाहीर करण्यात आलेले निकाल, निवड करण्यात आलेले उमेदवार तसेच इतर सर्व प्रक्रिया रद्द करण्यात येत आहेत.’
वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली समिती स्थापन होणार
झारखंड सरकारने भरती परीक्षांमध्ये सुधारणा करण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. वरिष्ठ IAS अधिकारी अमिताभ कौशल यांच्या अध्यक्षतेखाली परीक्षा सुधारणा समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी सांगितले की, ‘ही समिती परीक्षा प्रणालीतील त्रुटींचा आढावा घेणार असून भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह करण्यासाठी आवश्यक सूचना देणार आहे.’
JSSC आणि JSSC-CGL परीक्षा रद्द
झारखंड सरकारने 2014 पासून आउटसोर्स एजन्सी TSR Data Processing Pvt Ltd (TSR/TDPL) कडून घेण्यात आलेल्या सर्व परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मंत्रिमंडळाने झारखंड कर्मचारी निवड आयोगाची संयुक्त पदवीधर स्तरावरील परीक्षा (JSSC-CGL) देखील रद्द केली आहे. भरती परीक्षांमध्ये समोर आलेल्या कथित अनियमितता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे.
देवेंद्र महतो काय म्हणाले?
परीक्षा रद्द झाल्याची बातमी समोर येताच जयपाल मुंडा स्टेडियममध्ये धरणे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली आणि सरकारच्या निर्णयाची चर्चा सुरू झाली. परीक्षा रद्द झाल्यानंतर गेल्या 16 दिवसांपासून उपोषण करणारे देवेंद्र नाथ महतो यांनी, ‘मी उपोषण सोडणार आहे. मात्र संघर्ष सुरूच राहील.’ अशी प्रतिक्रिया दिली आहे.