जो चारित्र्यवान नाही तो…महाराज स्वरा भास्करवर भडकले; त्या वादात उडी; प्रकरण तापणार?
अभिनेत्री स्वरा भास्करच्या 'जौहर' वक्तव्यामुळे निर्माण झालेल्या वादावर कथावाचक अनिरुद्धाचार्य यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी स्वरा भास्करला टोला हाणला. तसंच राहुल गांधी यांनाही सुनावलं

बॉलीवूड अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhaskar) हिच्या एका वक्तव्यामुळे सध्या घमासान माजलं आहे. काही दिवसांपूर्वीच स्वराने ‘पद्मावत’ चित्रपटातील ‘जौहर’च्या सीनवर बोलताना एक विधान केलं, त्यामुळे बराच गदारोळ झाला. मात्र त्यानंतर स्वराने स्पष्टीकरणही दिलं. मात्र ‘जौहर’ करणाऱ्या स्त्रियांना आणि राणी पद्मावती यांना स्वराने ‘भ्याड’ म्हटलं असा दावा काहींनी केला. या मुद्यावरून वाद चांगलाच पेटल्यानंतर स्वराने एक व्हिडीओ जारी करत तिच्या वक्तव्याचा अर्थ समजावत, मला तसं म्हणायचं नव्हतं असं स्पष्टीकरणही दिलं. तिच्यावर चहूबाजूंनी टीका झाली. त्यातच आता कथावाचक अनिरुद्धाचार्य यांनीही यावरून प्रतिक्रिया दिली आहे. हा विषय एवढा गहन आहे की, केवळ चारित्र्यवान व्यक्तीच ते समजू शकते. ज्याचं चारित्र्य चांगले नाही, तो हे (मुद्दा) समजू शकत नाही, असा टोला त्यांनी हाणला.
जीवनापेक्षाही व्यक्तीचं चारित्र्य मौल्यवान
या प्रकरणाबाबत बोलताना कथावाचक अनिरुद्धाचार्य म्हणाले, ‘ रानी पद्मावती यांच्यासारख्या महिला पवित्र स्त्रिया होत्या. त्यांना सती म्हटलं जातं. त्यांनी आपल्या सन्मानाच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं. या कथांमधून आपण हे समजून घेतलं पाहिजे की, जीवनापेक्षाही अधिक मौल्यवान काही असेल, तर ते म्हणजे एखाद्या व्यक्तीचं चारित्र्य. त्यामुळे आयुष्य गेलं तरी चारित्र्य जाऊ देता कामा नये. ही इतकी गहन गोष्ट आहे की ती केवळ एखादी चारित्र्यवान व्यक्तीच समजू शकते. ज्याचं चारित्र्य चांगले नाही, ती व्यक्ती या गोष्टी समजून घेणार तरी कसं? चारित्र्यवान व्यक्तीच दुसऱ्या चारित्र्यवान व्यक्तीचा सन्मान करेल’ असं त्यांनी नमूद केलं.
राहुल गांधींवरही साधला निशाणा
यावेळी त्यांनी स्वरा भास्करवर तर टीका केलीच पण काँग्रेस नेता राहुल गांधी यांच्याबद्दलही ते बोलले. काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी मनुस्मृतीचा उल्लेख करत महिलांचं त्यांचे वडील, भाऊ, आणि पतीवर असलेल्या अवलंबित्वाबाबत एक वक्तव्य केलं होतं, त्यावरही कथावाचक अनिरुद्धाचार्य यांनी प्रतिक्रिया दिली. ‘ राहुल गांधी हे कधी तीन तलाक बाबात बोललेत का ? ते कधी बुरख्या बाबत बोलले ? तिहेरी तलाक हा महिलांचा सन्मान आहे का? पण या मुद्यांवर राहुल गांधी कधीच बोलत नाहीत. ते फक्त सनातन धर्माला टार्गेट करतात. सनातन धर्माचा अपमान आणि अनादर करतात’ अशा शब्दांत अनिरुद्धाचार्य यांनी राहुल गांधींवर टीका केली.
‘राहुल गांधी यांनी मनुस्मृती थोडं वाचलं पाहिजे. ‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते.’ हे त्यातच लिहीलं आहे. तुम्हाल एखाद्या गोष्टीतील खोट काढायची असेल किंवा उणीव पहायची असेल तर तुम्ही तेच पहाल. या समाजानेही तर सीतामाई यांच्यातील उणीव पाहिली होती. जर तुम्हाला मनुस्मृतिमध्ये वाईटचं शोधायचं असेल, अर्थाचा अनर्थ करायचा असेल, तर मग अनर्थ करून त्यात दोष शोधा’ – असंही ते म्हणाले.
‘ या जगात सर्व प्रकारचे लोक असतात, जसी चांगली लोकंअसतात तशी वाईटही. प्रत्येक ठिकाणी चांगुलपणाही दिसेल आणि वाईटपणाही. संतजन म्हणतात ना—‘बुरा जो देखन मैं चला, बुरा न मिलिया कोय, जो दिल खोजा आपना, मुझसे बुरा न कोय. म्हणजेच, आपण इतरांमध्ये दोष शोधण्यापूर्वी स्वतःच्या अंतर्मनात डोकावून पाहिलं पाहिजे. तुमचा सनातन धर्माशी काहीही संबंध नसेल, तर तुम्ही केवळ सनातन धर्माला टार्गेट कराल, त्याचा अपमान कराल आणि त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न कराल’ असं अनिरुद्धाचार्य यांनी सुनावलं.
राहुल गांधी यांनी थोडं वाचन केलं पाहिजे. जर तु्म्हाला मनुस्मृति समजत नसेल, तर तुम्ही त्यात का शिरता ?असा सवालही त्यांनी विचारला.