Dharmendra Pradhan: केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान स्वत: किती शिकले?
Dharmendra Pradhan: केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी होत आहे. यादरम्यान शिक्षणमंत्री स्वत: किती शिकले आहेत, त्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी काय आहे, त्याबद्दल जाणून घ्या..

नीट पेपरफुटी आणि शिक्षण क्षेत्रातील गैरव्यवहारांवरून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याविरोधात देशभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी केली जात आहे. यासाठी गेल्या महिनाभरापासून दिल्लीतल्या जंतर मंतर याठिकाणी कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे. आज या आंदोलनाचा 32 वा दिवस आहे. सोमवारी आंदोलनकर्त्यांनी थेट संसद भवनवर धडक मोर्चा काढला होता. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर धर्मेंद्र प्रधान चर्चेत आले आहेत. केंद्रीय शिक्षणमंत्री असलेले प्रधान स्वत: किती शिकले आहेत, त्याबद्दल जाणून घेऊयात..
धर्मेंद्र प्रधान हे जून 2024 पासून देशाचे केंद्रीय शिक्षणमंत्री आहेत. त्यांचा जन्म 26 जून 1969 रोजी ओडिशातील तालचर इथं झाला. धर्मेंद्र प्रधान यांचं 9 डिसेंबर 1998 रोजी लग्न झालं असून त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. त्यांनी 1983 मध्ये ओडिशातील तालचर कॉलेजमध्ये उच्च माध्यमिकचं शिक्षण घेताना ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषद’चे कार्यकर्ते म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती. 1985 मध्ये ते तालचर कॉलेज विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष झाले. 1993 मध्ये त्यांची एबीव्हीपीच्या राज्य सचिवपदी आणि 1995 मध्ये राष्ट्रीय सचिवपदी नियुक्ती झाली. तर 1998 मध्ये ते भारतीय जनता पार्टीत सहभागी झाले. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ओडिशा इथल्या वाणी विहारमधील उत्कल विद्यापिठातून मान अँथ्रोपोलॉजीमध्ये पदव्युत्तर पदवी (एम.ए.) मिळवली आहे.
सोमवारी संसद भवन परिसरातील आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि अश्रुधुराच्या नळकांड्याही फेकल्या. याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच देशभरात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. विविध सेलिब्रिटींनी या आंदोलनाला पाठिंबा देत सरकारवर टीका केली आहे. त्या विद्यार्थ्यांचं, आंदोलकांचं एकदा म्हणणं तरी ऐकून घ्या, असं आवाहन सेलिब्रिटी करत आहेत. तर दुसरीकडे केंद्रीय मंत्र्यांनीच इथे चर्चेसाठी यावं, अशी भूमिका आंदोलकांनी मांडली आहे.
दरम्यान समाजवादी प्रमुख अखिलेश यादव यांनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा का घेतला जात नाहीये, यावर प्रतिक्रिया दिली आहे. “राजीनाम्यासाठी दबाव वाढत नाहीये, कारण त्यांना माहीत आहे की जर त्यांनी राजीनामा दिला तर धर्मेंद्र प्रधान लपलेली रहस्ये उघड करू शकतात. स्वातंत्र्यानंतर कोणतंही सरकार असं वागेल याची कोणी कल्पनाही केली नव्हती.”
