लखीमपूर खिरी प्रकरण: जखमी शेतकऱ्यांना तातडीने दहा लाखांची मदत द्या; संयुक्त किसान मोर्चाची मागणी

| Updated on: Nov 13, 2021 | 6:47 AM

लखीमपूर खिरी घटनेत जे शेतकरी जखमी झाले आहेत त्या सर्व शेतकऱ्यांना सरकारने केलेल्या घोषणेनुसार तातडीने प्रत्येकी दहा लाख रुपये देण्यात यावेत, अशी मागणी संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे.

लखीमपूर खिरी प्रकरण: जखमी शेतकऱ्यांना तातडीने दहा लाखांची मदत द्या; संयुक्त किसान मोर्चाची मागणी
Follow us on

नवी दिल्ली – लखीमपूर खिरी घटनेत जे शेतकरी जखमी झाले आहेत त्या सर्व शेतकऱ्यांना सरकारने केलेल्या घोषणेनुसार तातडीने प्रत्येकी दहा लाख रुपये देण्यात यावेत, अशी मागणी संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे. गेल्या वर्षभरापासून केंद्राच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचे नेतृत्व शेतकऱ्यांची संघटना असलेल्या संयुक्त किसान मोर्चाकडून करण्यात येत आहे. लखीमपूर खिरी घटनेमध्ये चार शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता, तर अनेक जण जखमी झाले होते.  मात्र जखमींना अद्यापही मदत मिळाली नसल्याचे शेतकरी संघटनेच्या वतीने सांगण्यात आले आहे.

आतापर्यंत 13 जणांना अटक 

लखीमपूर खिरीमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असताना झालेल्या दुर्घटनेत एकूण आठ जणांचा मृत्यू झाला होता. यामध्ये चार शेतकऱ्यांचा समावेश आहे. तसेच अनेक शेतकरी जखमी देखील झाले होते. भाजपा नेत्याच्या मालिकीच्या असलेल्या वाहानाने या शेतकऱ्यांना चिरडल्याचा आरोप करण्यात येत आहे. पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशीष मिश्रा यांच्यासह 13 आरोपींना अटक केली आहे. या घटनेत मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 45 लाख रुपये तर जे जखमी झाले आहेत, त्यांना प्रत्येकी दहा लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा योगी सरकारकडून करण्यात आली होती. मात्र अद्यापही जखमी शेतकऱ्यांना मदत देण्यात आलेली नाही. या शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्यात यावी अशी मागणी किसान मोर्चाकडून करण्यात आली आहे.

22 नोव्हेंबरला महापंचायत 

दरम्या दुसरीकडे गेले वर्षभर कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करून देखील सरकारकडून दखल घेतली जात नसल्याने आता शेतकरी अधिक आक्रमक झाले आहेत. जर येत्या 26 नोव्हेंबरपर्यंत सरकारने दखल न घेतल्यास तिव्र आंदोलन करू असा इशारा किसान मोर्चाच्या नेत्यांकडून देण्यात आला आहे. 22 नोव्हेंबरला किसान मोर्चा आणि अन्य शेतकरी संघटनांकडून लखनऊमध्ये महापंचायत बोलावण्यात येणार आहे. या महापंचायतीची जोरदार तयारी सुरू असल्याचे पहायला मिळत आहे. या महापंचायतीमध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन संघटनेकडून करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

Salman Khurshid: “माझे पुस्तक हिंदू-मुस्लीम ऐक्यासाठी, न्यायालयाचा अयोध्येवरील निकाल चांगला आहे”

भारतीय अष्टपैलू खेळाडू आणि BCCI अधिकाऱ्यावर विनयभंगाचा आरोप, अंडरवर्ल्ड गँगस्टरच्या पत्नीची तक्रार

प्रादेशिक राजकीय पक्षांनीचा 55% निधी “अज्ञात सोर्सेज” कडून, एकूण 885.95 कोटी रुपये निधी गोळा