
भारतात जेव्हा कधी गॅस सिलिंडरची कमतरता किंवा पुरवठ्यात विलंब झाल्याच्या बातम्या येतात, तेव्हा एक सवाल वारंवार उपस्थित होतो. तो म्हणजे जर भारत कच्चे तेल आणि पेट्रोल-डिझेल महिनोंमहिने साठवू शकतो, तर मग गॅसच्या बाबतीत हे का शक्य होऊ शकत नाही? भारत आता जगातील सर्वांत मोठ्या ऊर्जा अर्थव्यवस्थांपैकी एक बनला आहे, त्यामुळे सर्वसामान्य लोकांना हा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. परंतु यामागचं वास्तव वेगळंच आहे. तेल आणि गॅस साठवण्याच्या पद्धती पूर्णपणे वेगळ्या आहेत. खर्च, सुरक्षा आणि तंत्रज्ञानाच्या दृष्टीकोनातून पाहिल्यास तेलाच्या तुलनेत गॅसची साठवण करणं खूपच आव्हानात्मक आहे.
कच्चं तेल, पेट्रोल, डिझेल हे सर्व द्रव स्वरुपातील इंधन आहेत. सर्वसामान्य तापमानातही ते द्रव स्वरुपातच राहतात. त्यामुळे मोठ्या टाक्यांमध्ये ते सहजपणे साठवता येतं. भारतासह जगभरातील अनेक देशांनी पेट्रोलियमचे साठे तयार केले आहेत. भारतात विशाखापट्टणम, मंगळुरू आणि पादूर इथं धोरणात्मक दृष्टीकोनातून (कठीण काळात उपयोगी पडेल या दृष्टीने) पेट्रोलियम साठे आहेत. जमिनीखाली मोठ्या खडकांमध्ये कोरलेल्या गुहांमध्ये हे साठे असतात. यामध्ये लाखो टन कच्चं तेल साठवलं जातं.
आपत्कालीन परिस्थितीत, युद्धसदृश परिस्थितीत काही दिवसांसाठी सुरक्षित पुरवठा व्हावा, या हेतूने मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाचा साठा केला जातो. युद्ध सुरू झालं, जागतिक संकट आलं किंवा तेल पुरवठा विस्कळीत झाला तर आपल्या देशात काही आठवडे किंवा महिने पुरेल इतका हा तेलसाठा असतो.
जर तेल साठवणं इतकं सोपं असेल तर गॅसच्या बाबतीत कोणती अडचण येते? या प्रश्नाचं सोप्या शब्दांत उत्तर म्हणजे, गॅस हा सर्वसामान्य तापमानात (रुम टेंपरेचर) तो वायू स्वरुपात असतो. त्यामुळे तेलासारख्या मोठ्या टाक्यांमध्ये हा गॅस साठवता येत नाही. गॅस साठवण्याचे दोन मार्ग आहेत. पहिला म्हणजे गॅस खूप उच्च दाबाखाली साठवता येतो. दुसरा, तो खूप कमी तापमानात द्रव स्वरुपात साठवता येतो. जर गॅस लहान जागेत साठवायचा असेल तर दाब खूप वाढवावा लागेल किंवा तापमान खूप कमी करावं लागेल. ही संपूर्ण प्रक्रिया गुंतागुंतीची आणि महाग आहे.
LNG चा फुल फॉर्म आहे लिक्विफाइड नॅच्युरल गॅस (Liquefied Natural Gas, द्रवरुप नैसर्गिक वायू). हा वायू -162 अंश सेल्सिअस तापमानाला थंड केला जातो. थंड झाल्यावर वायूचं द्रव्यात रुपांतर होतं. जेव्हा वायू द्रवरुप होतं, तेव्हा त्याचं आकारमान अंदाजे 600 पटींनी कमी होतं. त्यामुळे लांब अंतरावर पाठवण्यासाठी आणि वाहतूक करण्यासाठी ते सोपं होतं. परंतु या संपूर्ण प्रक्रियेसाठी खूप महागड्या पायाभूत सुविधांची आवश्यकता असते. त्यासाठी खास एलएनजी प्लांट, क्रायोजेनिक टँक आणि खास एलएनजी जहाजांची गरज असते. म्हणजेच साठवणूकपासून ते वाहतुकीपर्यंत.. ही संपूर्ण प्रक्रिया अत्यंत खर्चिक आणि गुंतागुंतीची आहे.
LPG चा फुल फॉर्म आहे लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस. हा पेट्रोलियमपासून मिळणारा गॅस आहे आणि त्याच प्रामुख्याने दोन प्रकार असतात. एक प्रोपेन आणि दुसरा ब्युटेन. एलपीजी हा सर्वसामान्य तापमानात (रुम टेंपरेचर) थोड्या दाबाने सिलिंडरमध्ये द्रव स्वरुपात साठवता येतं. म्हणूनच एलपीजी सिलिंडरचा वापर घराघरांत स्वयंपाकासाठी केला जातो. भारतात इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या तीन कंपन्या प्रामुख्याने घरगुती गॅसचं वितरण करतात. या कंपन्यांचे देशभरात हजारो बॉटलिंग प्लांट आणि लाखो डीलर नेटवर्क आहेत.
एलएनजी आणि एलपीजी हे दोन्ही एकच आहेत, असं अनेकांना वाटतं. परंतु प्रत्यक्षात या दोघांमध्ये खूप फरक आहे. एलपीजी हे पेट्रोलियमपासून बनवलं जातं आणि ते सिलिंडरमध्ये साठवून घरोघरी स्वयंपाकासाठी वापरलं जातं. तर एलएनजी नैसर्गिक वायूपासून तयार केलं जातं आणि ते वीज निर्मिती, उद्योगांमध्ये वापरलं जातं. एलएनजी पाइपलाइनद्वारे पुरवलं जातं. म्हणजेच या दोन्ही वायूंचा वापर, रचना आणि साठवणुकीची पद्धत पूर्णपणे वेगळी आहे.
भारताला जितक्या गॅसची गरज आहे, त्यापैकी बहुंताश भाग आयात करावा लागतो. कतार, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, रशिया आणि संयुक्त अरब अमिरात इथून गॅसची आयात केली जाते. भारतात LNG चे अनेक टर्मिनल आहेत. हाजिरा, कोची, धामरा एलएनजी टर्मिनलमध्ये एलएनजीला गरम करून त्याचं गॅसमध्ये रुपांतर केलं जातं आणि नंतर पाइपलाइनद्वारे देशातील विविध भागांमध्ये पाठवलं जातं.
सध्या इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील युद्धाचे पडसाद जगभरात उमटताना दिसत आहेत. भारतात एलपीजीच्या कमतरतेच्या बातम्या येत आहेत. यामागचं मुख्य कारण म्हणजे एलपीजीसाठी आपण आयातीवर बरेच अवलंबून आहोत. भारत आपल्या एलपीजी गरजेच्या 60% पेक्षा जास्त आयात करतो. त्यामुळे या आयातीच्या पुरवठ्यावर व्यत्यय आला किंवा आताच्या युद्धासारखं संकट आलं तर भारतात एलपीजीची कमतरता निर्माण होऊ शकते. कधीकधी मागणीत अचानक वाढ झाल्यानेही तुटवडा निर्माण होऊ शकतो.
एलपीजी रिफायनरीपासून बॉटलिंग प्लांट, त्यानंतर गॅस एजन्सी आणि तिथून ग्राहकांपर्यंत पोहोचतो. ही लांबलचक लॉजिस्टिक्स प्रक्रिया असल्यानेही कधीकधी टंचाई निर्माण होते. यापैकी कोणत्याही एकावर परिणाम झाला तर पुरवठ्यात व्यत्यत येतो. भारत हा जगातील तिसरा सर्वांत मोठा ऊर्जेचा ग्राहक बनला आहे. देशाची अर्थव्यवस्था विकसित होत असताना ऊर्जेच्या गरजादेखील वाढल्या आहेत. भारताने धोरणात्मक साठे उभारून तेलाच्या बाबतीत काही प्रमाणात सुरक्षितता मिळवली आहे. परंतु गॅसच्या बाबतीत देशाला बरंच काम करावं लागणार आहे.