दिवाळी साजरी करायला गावी निघाले होते, रात्रीतून 14 मृत्यू, 40 गंभीर, मध्य प्रदेशात काय घडलं?

| Updated on: Oct 22, 2022 | 9:36 AM

मध्य प्रदेशातील रीवा जवळ ऐन दिवाळीत दुर्दैवी घटना घडली

दिवाळी साजरी करायला गावी निघाले होते, रात्रीतून 14 मृत्यू, 40 गंभीर, मध्य प्रदेशात काय घडलं?
Image Credit source: social media
Follow us on

भोपाळः दिवाळी (Diwali) आल्याने गावापासून दूर राहणारे अनेक कामगार आणि नोकरदार आता गावी परतू लागलेत. मात्र अशाच गावी परतणाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या एका बसला भीषण अपघात (Accident) झालाय. यात 14 जणांचा जागीच मृत्यू झाला. मध्य प्रदेशातील रीवा जवळील राष्ट्रीय महामार्ग-30 वर एका खासगी बसला हा अपघात झाला. बसमधील 14 जणांचा मृत्यू झाला तर अन्य 40 प्रवासी जखमी झाले.

प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्याप्रमाणे, घटना झाली तेव्हा जखमी लोकांच्या ओरडण्याने वेदनादायी किंचाळ्यांनी परिसराला भयाण वातावरण आलं होतं.

शुक्रवारी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास रीवा परिसरातील पहाड घाटात हा अपघात झाला. हैदराबाद येथील सिकंदराबाद येथील प्रवाशांना घेऊन ही बस उत्तर प्रदेशच्या दिशेने निघाली होती. रीवा परिसरातील सोहागी घाट परिसरात हा अपघात झाला. एका माहितीनुसार, या बसमध्ये 100 पेक्षा जास्त प्रवासी होते.

राष्ट्रीय महामार्ग-30 वरील घाटातून उतरताना बसला अपघात झाला. हा अपघात एवढा भयंकर होता की बसच्या केबिनमध्येच 3-4 लोक अडकले.

अपघाताचं नेमकं कारण काय, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. प्राथमिक अंदाजानुसार, समोरून येणाऱ्या दुसऱ्या एका वाहनाशी बसची धडक होत होती.

समोरच्या वाहनाने अचानक ब्रेक दाबले. त्यामुळे मागून वेगाने येणारी बस थेट या वाहनावर आदळली. बस वाहनावर चढल्याने बसच्या केबिनमध्ये बसलेल्या लोकांसह सीटवर बसलेल्या काहींचा जागीच मृत्यू झाला.

रस्त्यावरील इतर प्रवाशांनी या अपघाताची माहिती तत्काळ पोलिसांना दिली. सोहागी पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. बसमध्ये अडकलेल्यांना मोठ्या शर्थीनं बाहेर काढण्यात आलं.

अपघातात अजूनही अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णवाहिकेमधून रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी या अपघातासंबंधी ट्विट केलंय. हा अपघात अत्यंत दुर्दैवी असून यातील मृत्यूची घटना दुःखदायक, वेदनादायक असल्याचं त्यांनी लिहिलंय.