Monsoon : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, मान्सून भारतात दाखल; हवामान खात्याची घोषणा, महाराष्ट्रात कधी?

Monsoon Arrive in India : भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नैऋत्य मान्सून वेळेआधीच भारतात दाखल झाला आहे. आता तो लवकरच केरळ आणि त्यानंतर महाराष्ट्रात दाखल होणार आहे.

Monsoon : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, मान्सून भारतात दाखल; हवामान खात्याची घोषणा, महाराष्ट्रात कधी?
Monsoon arrives in India
Image Credit source: Google
| Updated on: May 16, 2026 | 3:32 PM

राज्यासह संपूर्ण देशातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नैऋत्य मान्सून वेळेआधीच भारतात दाखल झाला आहे. सध्या मान्सूनने अंदमान आणि निकोबारमध्ये प्रवेश केला आहे. आयएमडीच्या माहितीनुसास, नैऋत्य मान्सूनने दक्षिण अरबी समुद्र, बंगालच्या उपसागराचा नैऋत्य आणि आग्नेय भाग, अंदमान समुद्राचा मोठा भाग, संपूर्ण निकोबार बेटे आणि श्री विजयपुरम परिसर व्यापला आहे. आता आगामी काळात तो संपूर्ण भारतभर पसरणार आहे.

लवकरच केरळ किनारपट्टीवर धडकणार

मान्सूनच्या आगमनाची घोषणा करताना हवामान विभागाने सांगितले की, सध्याची हवामान परिस्थिती आणि मान्सूनची हालचाल अनुकूल राहिल्यास, मान्सून केरळमध्ये नेहमीच्या तारखेपूर्वी पोहोचू शकतो. साधारणपणे मान्सून 1 जूनच्या आसपास केरळमध्ये दाखल होतो आणि त्यानंतर हळूहळू देशाच्या इतर भागांत पुढे सरकतो. मात्र, IMD ने शुक्रवारी दिलेल्या माहितीनुसार, यंदा नैऋत्य मान्सून 26 मे रोजी केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. मात्र यात 4 दिवस कमी किंवा जास्त कालावधी लागू शकतो.

हवामान विभाग 2005 पासून केरळमध्ये मान्सून आगमनाची अधिकृत भविष्यवाणी करत आहे. हा अंदाज देशात विकसित करण्यात आलेल्या सांख्यिकीय मॉडेलवर आधारित आहे. या मॉडेलमध्ये सहा प्रमुख घटकांचा वापर केला जातो. यात उत्तर-पश्चिम भारतातील किमान तापमान, दक्षिण द्वीपकल्पातील मान्सूनपूर्व पावसाचा उच्चांक, दक्षिण चीन समुद्र आणि नैऋत्य पॅसिफिक भागातील आउटगोइंग लॉन्गवेव्ह रेडिएशन, तसेच आग्नेय आणि ईशान्य हिंदी महासागरातील खालच्या स्तरावरील झोनल वाऱ्यांचा समावेश आहे. याचे आकलन करून मान्सूनची तारीख ठरवली जाते.

यंदा पाऊस कमी पडण्याची शक्यता

हवामान विभागाच्या माहितीनुसार, मान्सून कोकणात 6 जूनपर्यंत दाखल होण्याची शक्यता आहे. मात्र यावर्षी भारतात सरासरीपेक्षा कमी पाऊस होऊ शकतो. यामागे एल निनोची परिस्थिती हे संभाव्य कारण असल्याचे सांगितले जात आहे. यंदा केवळ 80 सेंटीमीटर पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसू शकतो. सिंचनासाठी पाण्याची कमतरता निर्माण होऊन शेतीवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे यंदाचे वर्ष चिंतेचे ठरण्याची शक्यता आहे.

Follow Us