
RSS Dattatray Hosabale: सध्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा हिंदू-मुस्लीम एकतेची वकील करत आहे. सनातन धर्मातंर्गत भारतीय मुसलमानांनी मुख्य प्रवाहात यावे असं आवाहनं करण्यात येत आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांचे मुस्लीम धर्मगुरू आणि मुस्लीम बुद्धीवाद्यांसोबत चर्चा झडत असतानाच संघाचे सहकार्यवाह दत्तात्रय होसबाळे यांचे एक वक्तव्य सध्या चर्चेत आले आहे. उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे त्यांनी हे वक्तव्य केले आहे. संघाच्याच एका कार्यक्रमातील त्यांच्या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
निसर्गाची पूजा करावी
बुधवारी गोरखपूर येथे हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात दत्तात्रय होसबाळे यांनी हे वक्तव्य केले. मुस्लीम बंधू जर हिंदूप्रमाणे निसर्गाची पूजा करतील तर त्यांचे काय बिघडणार असा सवाल त्यांनी केला. हिंदू नदीची पूजा करतात. सूर्य नमस्कार करतात. निसर्गाला पुजतात. तसेच जर मुसलमानांनी नदीची पूजा केली. सूर्य नमस्कार केला, तर त्यांचं काय बिघडणार? त्यांचं काहीच नुकसान होणार नाही असं होसबाळे यांनी स्पष्ट केलं. याचा अर्थ मुस्लिमांना दर्गा अथवा मशिदीत जाण्यास रोखणे असा होत नाही. आमचा हिंदू धर्म हा सर्वोच्च आहे. हाच धर्म सर्वच धर्मांची बाजू घेतो. त्यातील चांगल्या गोष्टींची चर्चा करतो.
इंग्रजांनी आपल्या देशात फोडा आणि राज्य करा ही नीती राबवली. पण आता आपल्याला एकत्र येण्याची गरज आहे. हिंदू जागरुक झाला तर विश्व जागरुक होईल. मानवाचा विश्वास वाढेल. आपण मुलांना हनुमान चालीसा, गीता वाचण करण्यास शिकवायला हवे. सध्या जिकडे तिकडे भारत विश्वगुरू होण्याची चर्चा सुरू आहे. पण जर आपलेच पतन झालेले असेल तर मग आपण इतरांना तरी कसं उभ करू शकतो? त्यामुळे जोपर्यंत आपण धर्म समजून घेत नाही तोपर्यंत इतरांना आपण मदत करू शकत नाही असे सूतोवाच त्यांनी केले.
गोरखपूर येथील खोराबार येथील मैदानावर हिंदू संमेलन घेण्यात आले. त्यांनी यावेळी सौदी अरब आणि रशियातील उदाहरणं समोर ठेवली. सौदी अरबमधील मुस्लीम बांधवांनी जमीन देऊन तिथे हिंदू मंदिर बांधण्यास मदत केली. तर रशियात चर्चच्या काही लोकांनी मंदिर बांधण्यासाठी जागा दिल्याचे वक्तव्य त्यांनी केले. आता आपल्याला भारतात याची जाणीव ठेऊन वागावं लागेल असं ते म्हणाले. या संमेलनाला गोरखपूर आणि आजूबाजूच्या जिल्ह्यातील 5 हजार लोकांची उपस्थिती होती.