केंद्रीय कॅबिनेट मंत्री आणि तरीही अटक, राणे पहिले नाहीत, तिसरे; काय घडलं होतं 2001 साली? वाचा सविस्तर

| Updated on: Aug 25, 2021 | 12:41 PM

केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांना अटक आणि सुटकेचं नाट्य संपूर्ण महाराष्ट्र आणि देशाने काल पाहिलं. त्यामुळे संपूर्ण राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे.

केंद्रीय कॅबिनेट मंत्री आणि तरीही अटक, राणे पहिले नाहीत, तिसरे; काय घडलं होतं 2001 साली? वाचा सविस्तर
narayan rane
Follow us on

नवी दिल्ली: केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांना अटक आणि सुटकेचं नाट्य संपूर्ण महाराष्ट्र आणि देशाने काल पाहिलं. त्यामुळे संपूर्ण राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. पण केंद्रीय मंत्र्याला अटक करण्याचं हे पहिलं उदाहरण नाहीये. अशा प्रकारे अटक होणारे नारायण राणे हे तिसरे केंद्रीय मंत्री आहेत. 2001मध्येही असंच एक प्रकरण घडलं होतं. काय होतं हे प्रकरण? त्यावर टाकलेला हा प्रकाश. (narayan rane is third union minister who arrested by police)

पहिल्यांदाच असं घडलं

देशाच्या इतिहासात तीन वेळा केंद्रीय मंत्र्यांना अटक करण्यात आली आहे. त्यातील राणे हे तिसरे केंद्रीय मंत्री आहेत. यापूर्वी अटलबिहारी वाजपेयींच्या मंत्रिमंडळातील केंद्रीय मंत्री टीआर बालू आणि मुरसोली मारन हे होते. टीआर बालू हे केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्री होते. तर मारन हे उद्योग मंत्री होते. एम. करुणानिधींची डीएमके त्यावेळी एनडीए सरकारमध्ये होती. डीएमकेच्या कोट्यातूनच त्यांना मंत्रिपद मिळालं होतं. मात्र हे दोन्ही नेते एका तिसऱ्याच नेत्याच्या भानगडीत फसले. त्यामुळे त्यांना अटकही झाली.

अटक आणि गोंधळ

त्यावेळी तामिळनाडूत एआयएडीएमकेची सत्ता आली होती. जयललिता या मुख्यमंत्री होत्या. 30 जून 2001मध्ये जयललिता यांच्या आदेशानुसार राज्यातील माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांना अटक करण्यात आली. चेन्नईतील कथित फ्लायओव्हर घोटाळ्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला होता. जेव्हा पोलीस करुणानिधी यांना अटक करण्यासाठी गेले तेव्हा डीएमकेचे कार्यकर्ते आडवे आले. टीआर बालू आणि मुरसोली मारनही त्यावेळी तिथेच होते. त्यावेळी पोलिसांनी घोटाळ्यातील आरोपाप्रकरणी करुणानिधी यांना अटक केली आणि सरकारी कामात व्यत्यय आणल्याबद्दल बालू आणि मारन यांना अटक करण्यात आली. त्याचबरोबर डीएमकेच्या काही कार्यकर्त्यांनाही अटक करण्यात आली. यावेळी मारन यांना धक्काबुक्की झाली होती. त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आलं. मारन हे करुणानिधींचे भाचे आहेत.

जेटलींची घोषणा

या घटनेनंतर प्रचंड गोंधळ झाला. अटकेचं हे संपूर्ण नाट्य सन टीव्हीवर दाखवण्यात आलं होतं. त्यानंतर तत्कालीन विधी व न्याय मंत्री अरुण जेटली यांनी केंद्रीय मंत्र्यांच्या अटकेबाबत लवकरच एक प्रक्रिया जाहीर करणार असल्याचं स्पष्ट केलं होतं.

राणेंबाबत काय घडलं?

राणे यांची जनआशीर्वाद यात्रा सध्या कोकणात आहे. रायगडच्या महाडमध्ये पत्रकारांशी बोलताना राणे यांनी मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष असल्याचं विसरले. त्यावेळी त्यांनी हिरक महोत्सव हा शब्द वापरला. मात्र, तिथे उपस्थित असलेले राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी मुख्यमंत्र्यांना अमृत महोत्सव असल्याचं सांगितलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपली चूक सुधारली. “आज 74 वर्षे पूर्ण करुन 75 व्या वर्षात अमृत महोत्सवी… नाही हिरक महोत्सवी… अमृत महोत्सवी वर्षात आपण पदार्पण करतो आहोत”, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यावरुन राणे यांनी मी तिथे असतो तर कानाखाली लगावली असती, असा शब्दांत नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर प्रहार केला होता. त्यानंतर राणेंविरोधात नाशिक, महाड, पुण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. नंतर त्यांना रत्नागिरी पोलिसांनी अटक करून महाड पोलिसांकडे सुपुर्द केलं होतं. त्यानंतर रात्री उशिरा महाड न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला होता. (narayan rane is third union minister who arrested by police)

 

संबंधित बातम्या:

फुग्याला भोक तुमच्या पडलं, आमच्या नाही; चंद्रकांत पाटील यांचा शिवसेनेवर पलटवार

वकिलांची टीम राणेंच्या घरी, सर्व खटले रद्द करण्यासाठी कोर्टात याचिका दाखल करणार

राणेंच्या अटकेसाठी थेट पोलिसांशी संवाद, अनिल परब अडचणीत येणार?; चंद्रकांत पाटलांनी केलं मोठं विधान

(narayan rane is third union minister who arrested by police)