हाफ चड्डी घालून भाषणं करणे हा राष्ट्रवाद नव्हे; शेतकऱ्यांचे हित पाहणे हा खरा राष्ट्रवाद: सचिन पायलट

| Updated on: Jan 04, 2021 | 8:06 AM

या काळात तुम्ही लव्ह जिहादसाठी कायदे बनवत आहात. तुम्हाला लग्नासारख्या गोष्टींवर चर्चा करायला वेळ आहे. मात्र, शेतकऱ्यांसाठी वेळ नाही. | Sachin Pilot

हाफ चड्डी घालून भाषणं करणे हा राष्ट्रवाद नव्हे; शेतकऱ्यांचे हित पाहणे हा खरा राष्ट्रवाद: सचिन पायलट
Follow us on

जयपूर: हाफ चड्डी घालून खोटी भाषणं देण्याला राष्ट्रवाद म्हणत नाहीत. तर शेतकऱ्यांच्या (Farmers) हिताविषयी बोलणे हा खरा राष्ट्रवाद आहे, असे वक्तव्य काँग्रेसचे नेते सचिन पायलट (Sachin Pilot) यांनी केले आहे. ते रविवारी जयपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि केंद्र सरकारला लक्ष्य केले. (Congress leader Sachin Pilot slams BJP over Farm laws)

या काळात तुम्ही लव्ह जिहादसाठी कायदे बनवत आहात. तुम्हाला लग्नासारख्या गोष्टींवर चर्चा करायला वेळ आहे. मात्र, तुमच्याकडे शेतकऱ्यांसाठी वेळ नाही. हा म्हणजे शेतकऱ्यांचे भवितव्य अंधारात लोटण्याचा प्रकार आहे, अशी टीका सचिन पायलट यांनी केली. त्यामुळे आता सचिन पायलट यांच्या टीकेला भाजपकडून कशाप्रकारे प्रत्युत्तर दिले जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या 40 दिवसांपासून शेतकरी संघटना दिल्लीच्या वेशीवर ठाण मांडून बसल्या आहेत. आतापर्यंत केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांमध्ये सहावेळा चर्चा झाली. मात्र, या सर्व बैठका निष्फळ ठरल्या आहेत. शेतकरी संघटना या कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर ठाम आहेत. मात्र, केंद्र सरकारही मागे हटण्यास तयार नाही. या पार्श्वभूमीवर सोमवारी दिल्लीत शेतकरी संघटनांचे नेते आणि केंद्र सरकार यांच्यात सातव्यांदा चर्चा होणार आहे.

यापूर्वीच्या बैठकीत काय घडले होते?

गेल्या बुधवारी केंद्राची झालेली सहावी बैठक तोडग्याविना संपली होती. मात्र, त्यात दोन मुद्यांवर सहमती झाली होती. प्रस्तावित वीज अधिनियम दुरुस्ती कायद्यात बदल केले जाणार असून, वीज वापरावर शेतकऱ्यांना मिळणारे अनुदान पूर्वीप्रमाणे कायम राहील. तसेच प्रदूषण नियंत्रणासंदर्भातील अध्यादेशातही दुरुस्ती केली जाईल, असे आश्वासन सरकारने दिले होते.

संबंधित बातम्या:

दिल्लीच्या सीमेवरील आंदोलनाचा 37 वा दिवस; नववर्षानिमित्त शेतकऱ्यांनी काय केलं?

केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांची 7 वी बैठक संपली, अद्यापही तोडगा नाहीच

मोदी सरकार अंबानी, अदानींसारख्या मक्तेदारांच्या हितासाठी कार्यरत : विश्वास उटगी

(Congress leader Sachin Pilot slams BJP over Farm laws)