NCERT च्या पुस्तकावरून ‘आणीबाणी’; इयत्ता 9 वीच्या पुस्तकात Emergency वर धडा, देशभरात वादाची शाळा
NCERT New Book Emergency Chapter: एनसीईआरटीच्या इयत्ता 9 वीच्या सामाजिक शास्त्रच्या नवीन पुस्तकावरून वाद पेटला आहे. या पुस्तकात पहिल्यांदाच 1975 मधील आणीबाणीचा धडा समाविष्ट करण्यात आला आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निकालातून लोकशाही कशी नांदली याची माहिती यामध्ये देण्यात आली आहे.

NCERT New Book Emergency Chapter: राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (NCERT) इयत्ता 9 वीच्या पुस्तकात आणीबाणीचा धडा समाविष्ट करण्यात आला आहे. सामाजिक शास्त्र पुस्तकात ‘Understanding Society: India and Beyond-Part 1’ अशा आशयाचा धडा समाविष्ट करण्यात आला आहे. इयत्ता 9 वीतील विद्यार्थ्यांना पहिल्यांदाच 1975 मध्ये लावण्यात आलेल्या आणीबाणीविषयीची माहिती देण्यात आली आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निकालातून लोकशाही कशी नांदली याची साध्या सोप्या शब्दात माहिती देण्यात आली आहे. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या काळात देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती. आता हा धडा अभ्यासक्रमात दाखल झाल्याने देशभरात वादाची शाळा भरली आहे. अनेकांनी सरकारच्या या निर्णयावर आक्षेप घेतला आहे.
पहिल्यांदाच शालेय स्तरावर आणीबाणीचा धडा
देशात आणीबाणीच्या काळात अनेक घटना घडल्या. या काळात काय काय घडले याची माहिती उच्च शिक्षणातील अभ्यासक्रमात देण्यात आलेली होती. ती शिकवण्यातही येत होती. पण आता पहिल्यांदाच शालेय स्तरावर भारतीय राजकारणातील एका महत्त्वाच्या घडामोडीचा धडा शिकवण्यात येणार आहे. भारतीय लोकशाही ताकद, राजकारणातील चढउतार, भारतीय नागरिकांचे घटनात्मक अधिकार याची ओळख पटण्यासाठी हा धडा इयत्ता 9 वीच्या सामाजिक शास्त्र या विषयात समाविष्ट करण्यात आल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे.
भारतीय लोकशाहीतील वादग्रस्त कालावधी
NCERT च्या नवीन पुस्तकात वर्ष 1975 ची आणीबाणी आणि त्याकाळीतील सरकारचे धोरण, वादात सापडलेले निर्णय, आव्हानात्मक काळ याचे वर्णन करण्यात आले आहे. ही सर्व माहिती साध्या आणि सोप्या शब्दात मांडण्यात आली आहे. आणीबाणी केव्हा आणि का लावण्यात येते. घटनेत त्याविषयीची काय तरतूद आहे. लोकशाही देशातील नागरिकांचे हक्क, अधिकार काय आहेत, न्यायालयाची भूमिका काय आहे याचा ऊहापोह या धड्यात करण्यात आला आहे.
NCERT च्या पुस्तकात आणीबाणी या विषयावरील धड्यात कायदेशीर बाजूही समोर आणण्यात आली आहे. त्याकाळात भारतीय राजकारणात काय भूंकप आला याची माहिती देण्यात आली आहे. या धड्यात अलाहाबाद हायकोर्टाच्या त्या ऐतिहासिक फैसल्याविषयी माहिती देण्यात आली आहे. त्यात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची निवड बेकायदेशीर ठरवण्यात आल्याची माहिती देण्यात आली. उच्च न्यायालयाच्या निकालानंतर देशातील राजकीय अस्थिरता वाढली आणि तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सल्ल्यानंतर 25 जून 1975 रोजी देशात आणीबाणी लागू करण्यात आल्याचा उल्लेख या धड्यात करण्यात आला आहे.
21 महिन्यानंतर देशात लोकशाही
या धड्याच्या अखेरीस त्या काळातील घडामोडींचा ओघवता आढावा घेण्यात आला आहे. आणीबाणीचा कालावधी संपल्यानंतर लोकशाही बहाल झाल्याचे म्हटले आहे. देशात आणीबाणीचा कालावधी 21 महिने होता आणि या दीर्घकाळानंतर देशात लोकशाही आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. जानेवारी 1977 मध्ये देशात सार्वत्रिक निवडणूक जाहीर करण्यात आली होती. मार्च 1977 मध्ये अधिकृतपणे आणीबाणी संपुष्टात आणल्याची घोषणा सरकारने केली.